सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात गेल्या तीन वर्षांत १४ बिबटय़ांना जीव गमवावा लागला आहे, तसेच पाच हत्ती मृत्युमुखी पडले आहेत. बेसुमार वृक्षतोड व वनखात्याची हेळसांडपणामुळे वन्यप्राणी लोकवस्तीत घुसत आहेत. त्यासाठी वनखात्याच्या कार्यक्षेत्रात अभयारण्याची गरज आहे, पण त्याकडे यंत्रणेचे लक्ष नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात विस्तीर्ण पश्चिम घाट अर्थात सह्य़ाद्रीचा पट्टा आहे. या पट्टय़ात विपुल वन्यप्राणी आहेत. पण यांच्या संवर्धनासाठी व संरक्षणासाठी कोणत्याही योजना वनखात्याकडे नाही. उलट जंगलात मनुष्यप्राण्याची सुरू असलेली घुसखोरी पाहता वन्यप्राणी लोकवस्तीत घुसत असल्याचे चित्र उभे राहिले आहे.हत्ती हा प्राणी महाराष्ट्र राज्याच्या जंगलात नव्हता, पण कर्नाटकाच्या दांडेली अभयारण्यातून सन २००० च्या दरम्यान हत्तीचा कळप दोडामार्ग तालुक्यातील मांगेलीतून तिलारीस्थळी आला. सुमारे २३ हत्ती एकाच कळपातून आले होते. सध्या जिल्ह्य़ात चार हत्ती वास्तव्यास आहेत. त्यामुळे हत्ती महाराष्ट्रात असल्याची नोंद राष्ट्रीय स्तरावर झाली आहे, पण या हत्तीचे संरक्षण करण्यास वनखात्याच्या हलगर्जीपणा दाखविल्याने पाच हत्तींचा बळी घेतला गेला आहे. हत्ती, बिबटे यांचे संरक्षण करण्यास वनखाते असमर्थ ठरले आहेत. जिल्ह्य़ात विपुल जंगल संपत्ती आहे. वनखात्याचे जंगल मोठे आहे. तसेच पाण्यासाठी पाटबंधारे प्रकल्पही आहेत, पण वन्यप्राण्यांच्या वास्तव्यासाठी अभयारण्य नाही. त्यामुळे वन्यप्राणी मनुष्यप्राण्याच्या घुसखोरीमुळे लोकवस्तीत घुसत आहेत. वणवे लावले जात असल्याने वन्यप्राण्यांचे सैरावैरा पळणेही थांबविता येणे शक्य नाही अशा अत्यंत बिकट परिस्थितीत वन्यप्राणी सापडला आहे. वनसंस्था नोंद असणाऱ्या ठिकाणीही बेसुमार वृक्षतोड करून डोंगर बोडके करण्यात आलेले आहेत. तसेच इको सेन्सिटिव्ह नोंद होण्याच्या भीतीने वृक्षतोडीत वाढही झालेली आहे.गेल्या तीन वर्षांत १४ बिबटे मृत्युमुखी पडले आहेत. फासकीत अडकले किंवा विहिरीत पडलेल्या बिबटय़ांची संख्या सर्वाधिक आहे. सन २०१० च्या प्राणिगणनेनुसार सध्या जिल्ह्य़ात तीन वाघ व ३२ बिबटे असल्याचे वनखात्याचे म्हणणे आहे. गेल्या तीन वर्षांत १४ बिबटे मृत्युमुखी पडले. त्यातील चार बिबटे फासकीत अडकून तर पाच बिबटे खड्डय़ात/विहिरीत पडून मृत्युमुखी पडले आहेत. सिंधुदुर्ग वन विभागाने सन २०१२ पासून सहा जिल्ह्य़ांना जीवनदान दिले. पारपोलीत घरात कुसलेला बिबटय़ा जिवंत मिळाला तर शिर्ये व पोंगुर्ले येथे विहिरीत पडलेले बिबटे बचावले. कोटकामते व मळेवाड येथेही बिबटय़ांना वाचविण्यात यश मिळाले. त्यांना जंगलात सोडण्यात आले. वन्य प्राण्याच्या हल्ल्यात सन २००९ मध्ये ३, सन २०१० मध्ये ४, सन २०११ मध्ये ७ व सन २०१२ मध्ये ५ शेतकरी जखमी झाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात वन्यप्राणी सन २००५ आणि सन २०१० च्या तक्त्यानुसार सांबर, गवा रेडा, चिता यांच्यात घट झाली आहे. हत्ती ४, वाघ ३, बिबटे ३२ आहेत. सन २००५ मध्ये चिता २७ होते, पण सन २०१० च्या गणनेत ३ असल्याचे उघड झाले आहे. सांबर सन २००५ मध्ये ११४ तर सन २०१० मध्ये २९, गवा रेडा सन २००५ मध्ये १०१ व सन २०१० मध्ये १०, माकड/वानर सन २००५ मध्ये २९८ व सन २०१० मध्ये ६८, तर काळवीट ५ आहेत.काळवीट ५, साळिंदर १, रानकुत्रे ६, अस्वल २, ससा ४ व शेकरू ४ असे वन्यप्राणी असल्याचे वनखात्याचे म्हणणे आहे. वनखात्याने वनप्राण्यांची जनगणना सर्वेक्षण अचूक केले नाही, असे प्राणिमित्रांचे म्हणणे आहे. लोकसहभागातून वन्यप्राणी गणना झाल्यास याहीपेक्षा वन्यप्राण्यांची संख्या वाढलेली असेल असे सांगण्यात येत आहे. सिंधुदुर्गच्या जवळच दाजीपूर अभयारण्य आहे, पण जिल्ह्य़ात अभयारण्य नाही. वन्यप्राणी मुबलक प्रमाणात आहेत. विपुल प्रमाणात पाणी आहे. त्या भागात अभयारण्य झाल्यास वन्यप्राण्यांना निवांतपणा मिळेल, असे वन्यप्राणी मित्र म्हणतात.