सध्या राज्यात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांवरून राजकीय वातावरण कमालीचं तापलं आहे. भाजपाने आक्रमक भूमिका घेत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसची अत्यंत महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीस शरद पवार यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांची उपस्थिती होती. बैठक पार पडल्यानंतर जयंत पाटील यांनी माध्यमांना माहिती दिली.

राष्ट्रवादीचं डोकं ठिकाणावर आहे का? सत्तेची इतकी लालसा आहे की… – चंद्रकांत पाटील

जयंत पाटील म्हणाले, “सध्या एटीएस व एनआयए या प्रकरणाची चौकशी करत आहे. या चौकशीच्या माध्यमातून काही ना काही ठोस अशा गोष्टी बाहेर येतील, असा आम्हाला विश्वास आहे. येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस याचं ठाम मत आहे की, जे गुन्हे झालेले आहेत, अंबानींच्या घराबाहेर जे वाहन सोडण्यात आलं आणि मनसुख हिरेन यांची हत्या याबाबतीत खोलात जाऊन ज्यांनी हे गुन्हे केलेले आहेत, त्यांना शोधून काढण्याचं काम ज्या यंत्रणा करत आहेत, त्यांचा तपास पूर्ण होणं आवश्यक आहे आणि मला खात्री आहे लवकरात लवकर तो तपास पूर्ण होईल.”

गृहखातं कोण चालवतं? अनिल देशमुख की अनिल परब? कारण… – फडणवीस

तसेच, “गृहमंत्र्यांनी राजीनामा देण्याचा प्रश्न उद्भवत नाही.  जो प्रमुख मुद्दा आहे, जी प्रमुख घटना झालेली आहे, त्यावरून लक्ष विचलीत करण्याची कोणतीही आवश्यकता नाही. अंबानींच्या घरासमोर जे वाहन ठेवलं आणि मनसुख हिरेन यांची हत्या, याचा शोध यावरच आमचं लक्ष आहे. यानंतर यथायोग्य उर्वरीत गोष्टी होतील.” असं जयंत पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलं.

“शरद पवार खरं बोलले पण ते अर्धसत्य आहे; …त्याच्या पुढचं वाक्य ते विसरले”

“देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळातील अनेकांवर आरोप झाले, त्यांनी कुणालाही राजीनामा द्यायला लावला नाही. मी त्या खोलात जाणार नाही, त्यांच्याशी आमची काही त्याबाबतीत स्पर्धा नाही. परंतु जसं समोर येतंय की महत्वाच्या गुन्ह्यापासून लक्ष विचलीत करण्याचा कुणाचा जर प्रयत्न सुरू असेल, तर ते देखील होता कामा नये.” असंही जयंत पाटील यांनी यावेळी बोलून दाखवलं.