वृक्ष लागवड ही लोकचळवळ व्हावी या हेतूने राज्यात १५ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत वन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या काळात वनविभागातर्फे जनतेला सवलतीच्या दरात रोपे पुरवण्यात येतील, अशी माहिती वनमंत्री संजय राठोड यांनी दिली.

‘वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र अभियान’ अंतर्गत खाजगी मालकीचे पडीत क्षेत्र आणि शेताच्या बांधावर, रेल्वे मार्गाच्या दुतर्फा, कालवाच्या दुतर्फा क्षेत्रात, सामूहिक पडीत क्षेत्र व गायरान क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.

इतक्या किंमतीत मिळणार रोपं

वनमहोत्सवाच्या काळात नऊ महिन्यांचे रोप केवळ आठ रुपयांना तर १८ महिन्यांचे मोठ्या पिशवीतील रोप ४० रुपयांना एक याप्रमाणे विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येईल, असे राठोड म्हणाले. वनेत्तर क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात वृक्षांची लागवड करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. ‘दिलासा’ आणि ‘प्रयास’ या संस्था व वन विभागाच्या सहकार्यातून यवतमाळ वनपरिक्षेत्रातील उमरसरा येथे १० हेक्टर वनक्षेत्रावर पुनर्वनीकरण करण्यात येणार आहे. या ठिकाणी प्रतिहेक्टर ६२५ रोपांप्रमाणे सहा हजार २५० रोपांची लागवड करण्यात येणार असल्याचे राठोड यांनी सांगितले.

पुनर्वनीकरणाच्या प्रस्तावांसाठी समिती

राष्ट्रीय वन नितीनुसार एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ३३ टक्के क्षेत्र वनाच्छादनाखाली आणणे व जैवविविधतेने लाभलेल्या वनक्षेत्राची जोपासणा करण्यासाठी अवनत वनक्षेत्रांचे पुनर्वनीकरण करण्यात येते. यासाठी प्राप्त झालेल्या प्रस्तावावर निर्णय घेण्याकरीता वनमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीची रचना करण्यात आली आहे. या समितीत अपर मुख्य सचिव (वने), अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक व केंद्रस्थ अधिकारी, सह सचिव (वने), वनसंरक्षक, यवतमाळ यांचा सदस्य म्हणून समावेश आहे.