भाजपासोबत राहायचं की नाही याचा निर्णय पुढील १० दिवसांत घेणार असल्याचं खासदार नारायण राणे यांनी सांगितलं आहे. काँग्रेस सोडल्यापासून नारायण राणे अद्यापही भाजपा प्रवेशाच्या प्रतिक्षेत आहेत. भाजपाकडून नारायण राणे यांना राज्यसभेची खासदारकी देण्यात आली आहे. मात्र अद्याप अधिकृत प्रवेश देण्यात आलेला नाही. नारायण राणे यांना वेटिंगवर ठेवण्यात आलं आहे. यावर बोलताना नारायण राणे यांनी वेटिंगलाही लिमिट असते असं म्हणत आगामी १० दिवसांत निर्णय घेऊ असं सूचक वक्तव्य केलं आहे. "येणाऱ्या १० दिवसांत मी भाजपासंबंधी निर्णय घेणार आहे. १० दिवसांनतर मी भाजपात असेन की माझा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष चालवायचा यासंबंधी निर्णय घेईन", असं नारायण राणे यांनी सांगितलं आहे. पुढे त्यांनी सांगितलं की, "भाजपाने मला काही कमिटमेंट दिल्या आहेत. त्या अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. मुख्यमंत्री यासंबंधी चार पाच दिवसांत मला सांगतील. त्यानंतर मी निर्णय घेईन". यावेळी त्यांनी प्रतिक्षेलाही मर्यादा असते सांगत आपली नाराजी व्यक्त केली. आता नारायण राणे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष आहे. नारायण राणेंनी चिठ्ठी टाकून घेतला काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय : शरद पवार राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे नेते नारायण राणे यांनी शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय हा चिठ्ठी टाकून घेतला होता, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केला आहे. नारायण राणे यांच्या ‘झंझावात’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी बोलताना त्यांनी हा दावा केला. "शिवसेना सोडल्यानंतर नारायण राणे यांच्यासमोर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोनच पर्याय होते. यापैकी कोणत्या पक्षात जायचे हे निश्चित होत नसल्याने त्यांनी चिठ्ठ्या टाकून निर्णय घ्यायचे ठरवले. त्यासाठी त्यांनी दोन चिठ्ठ्या तयार केल्या. एकात काँग्रेस आणि दुसऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस असे लिहिले. चिठ्ठी उचलल्यानंतर त्यात काँग्रेसचे नाव निघाले त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. नारायण राणेंनी आपल्या पुस्तकातच याची माहिती दिल्याचे", पवार यांनी यावेळी सांगितले.