दिल्लीपाठोपाठ आता राज्यातही फटाकेविक्री बंदीची चर्चा सुरु झाली आहे. फटाकेविक्री बंदीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन अंतिम निर्णय घेऊ अशी माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिली. विशेष म्हणजे रामदास कदम यांनी सूचक विधान केले असतानाच शिवसेना नेते संजय राऊत यांनी मात्र फटाकेविक्री बंदीला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे फटाकाविक्री बंदीवरुन शिवसेनेतच दोन गट पडल्याचे दिसते.

सुप्रीम कोर्टाने मंगळवारी दिल्लीत फटाके विक्रीबंदी कायम ठेवली होती. दिल्लीत ११ नोव्हेंबर २०१६ पासूनचा फटाके विक्रीच्या बंदीचा आदेश सुप्रीम कोर्टाकडून कायम ठेवण्यात आला. फटाक्यांमुळे दिल्लीत हवेत प्रदूषणाची पातळी वाढलेली असते. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला होता.

दिल्लीपाठोपाठ महाराष्ट्रातही फटाके विक्रीवर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी मंगळवारी महत्त्वपूर्ण विधान केले. फटाकेविक्री बंदीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी केल्यास राज्यातील हवामान सुधारेल आणि शेवटी शेतकऱ्यांनाच याचा फायदा होईल, असे त्यांनी सांगितले.

मंगळवारी मुंबईत राज्य सरकारतर्फे ‘प्रदूषणमुक्त दिवाळी संकल्प अभियान २०१७’ आयोजन करण्यात आले. फटाक्यांमुळे वायू आणि ध्वनीची प्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी राज्याच्या पर्यावरण विभागाने हे अभियान राबवले. मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करणार अशी शपथ घेतली. दुसरीकडे शिवसेना नेते संजय राऊत यांनी फटाकेविक्री बंदीला विरोध दर्शवला आहे.