राज्यात करोनाचा संसर्ग अद्यापही वाढतच आहे. दररोज मोठ्यासंख्येने करोनाबाधित आढळून येत असल्याने, रूग्णालयांमध्ये वैद्यकीय सुविधांसह जागा देखील अपुरी पडत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील तुरंगात कैदी ठेवण्याची क्षमता संपली असल्याने करोना संसर्गाची स्थिती लक्षात घेता या पुढे अत्याआवश्यक असेल तरच आरोपींना अटक करावे, असे आदेश कारागृहाचे अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी बजावलेले आहेत. यावरून आता भाजपा नेते आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. करोनाच्या लढाईत आरोपींना अटकच करणे बंद करणार का? असा सवाल शेलार यांनी केला आहे.

भाजपा नेते आशिष शेलार यांनी या संदर्भात केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “ अर्जुन सकपाळ या तरुणाने बोगस IAS प्रमाणपत्र मिळवून रत्नागिरीत जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाल्याचा बनाव रचला. बनावट अहवाल तयार करुन भांडूपच्या ड्रीम माँलमध्ये सनराइज हाँस्पिटलला अग्निशमन दलाची परवानगी घेतली गेली!”

तसेच, “करोनामुळे राज्यातील जेलमध्ये कैद्यांची व्यवस्था लावणे अवघड झाल्याने महाराष्ट्राचे अतिरिक्त पोलीस महासंचालक ( कारगृह) यांनी डीजीपींना पत्र लिहून विनंती केली आहे की, छोट्या गुन्ह्यातील नवीन आरोपी अटक करणे थांबवा! तिन्ही घटना गंभीर प्रश्न उपस्थित करणाऱ्या आहेत.” असंही शेलार यांनी सांगितलं आहे.

तर, “ करोनाच्या लढाईत अशा किती गोष्टी बोगस करुन सामान्य माणसे फसवली जाणार आहेत? करोनाच्या लढाईत आरोपींना अटकच करणे बंद करणार का? प्रशासन, कायदा सुव्यवस्था, राज्याचा शासकीय कारभार अशा प्रकारे ठाकरे सरकार संपूर्णत: गाठोड्यात बांधून ठेवणार आहे की काय?” असे सवाल देखील शेलार यांनी ठाकरे सरकारला उद्देशून केले आहेत.

तुरुंग भरले; अत्यावश्यक असेल तरच अटक करा

दरम्यान, राज्यातील ४६ कारागृहांची बंदिवान ठेवण्याची क्षमता २३ हजार २१७ एवढी असून सद्याच्या स्थितीमध्ये ३४ हजार ८९६ कैदी आहेत. क्षमतेपेक्षा ११ हजार ६७९ कैदी अधिक आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत कारागृहात संसर्ग वाढू शकतो असे लक्षात आले असल्याने आरोपीची अटक अत्यावश्यक असेल तरच करा, असे निर्देशित करण्यात आले आहे.