भाजपने गेल्या वर्षभराच्या काळात अनेक परदेश दौऱ्यांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा वाढविली असल्याचे मत अमित शहा यांनी व्यक्त केले. ते शनिवारी कोल्हापूरमधील भाजपच्या राज्य अधिवेशनात बोलत होते. यापूर्वीही भारताचे पंतप्रधान परदेश दौऱ्यांवर जात असत. मात्र, तेव्हा या दौऱ्यांची तितकीशी दखल घेतली जात नव्हती. ते काही विशेष बोलतही नसत. परंतु आताची परिस्थिती बदलली आहे. आता पंतप्रधान जेव्हा परदेश दौऱ्यावर जातात तेव्हा आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमे त्यांची आवर्जून दखल घेतात. परदेशातील लोकांमध्ये भारतीय पंतप्रधानांविषयीचे कुतूहल आणि लोकप्रियता वाढत असल्याचा दावा यावेळी अमित शहा यांनी केला.