सात मुलीनंतर मुलाच्या हट्टापायी आठव्यांदा बाळंतपणाला सामोऱ्या जाणाऱ्या मातेचा करून दुर्दैवी अंत झाल्याची घटना बीड जिल्ह्यात घडली आहे. या दुर्देवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. हे कुटुंब सध्या परभणी जिल्ह्यातील पाथरी येथे वास्तव्यास आहे. या प्रकरणी अद्याप काही कारवाई करण्यात आलेली नाही.

मीरा रामेश्वर एखंडे (वय 38) असे दुर्दैवी महिलेचे नाव असून, तिला आठव्यांदा प्रसूतीसाठी बीडच्या माजलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र बाळंतपणा वेळीच रक्तस्त्राव झाल्याने या महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर रक्त चढविण्यास सुरूवातही झाली. मात्र, रक्तस्त्राव काही केल्या थांबत नव्हता. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तात्काळ शहरातील इतर स्त्रीरोग तज्ज्ञांना पाचारण केले. ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सुरेश साबळे, तालुका आरोग्य अधिकारी अनिल परदेशी, डॉ. गजानन रूद्रवार व डॉ. राजेश रूद्रवार तसेच येथे असलेल्या परिचरिकांनी तब्बल तीन तास तिच्यावर उपचार केले. मात्र, सात मुलींच्या पाठीवर जन्माला येणाऱ्या मुलगा आणि त्याच्या आईला वाचविण्यात डॉक्टरांना अपयश आले.