अवजड वाहनाने मंगळवारी सायंकाळी उशिरा आणखी एका महिलेचा बळी घेतला. केडगाव येथे झालेल्या या अपघातात पादचारी महिलेचे जागीच निधन झाले. अपघातानंतर हा वाहनचालक वेगात निघून गेला.
अवजड वाहनांची बेदरकार वाहतूक आणि बेशिस्त रहदारी यामुळे शहरात अपघातांची मालिका सुरूच आहे. मागच्याच आठवडय़ात औरंगाबाद राज्यमार्गावर महानगरपालिकेचा शिपाई मनपाच्या जवळच मालमोटारीच्या धडकेने ठार झाला. मंगळवारी केडगाव येथे अशाच अपघातात मंगल आदिनाथ काळे (वय ५०, रा. दूधसागर सोसायटी, केडगाव) या ठार झाल्या. वैद्यकीय उपचारासाठी त्यांना रुग्णालयात नेण्यात आले होते, मात्र तत्पूर्वीच त्यांचे निधन झाले. याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.