शिवसेना आमदार भास्कर जाधव सध्या चर्चेत असून विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. मुख्यमंत्र्यांच्या चिपळूण दौऱ्यात भास्कर जाधव यांनी मदत मागणाऱ्या महिलेसोबत केलेले अरेरावी याचं मुख्य कारण आहे. आपल्याला मदत करा, हवं तर आमदारांचा एक दोन महिन्याचा पगार देऊ नका अशी विनंती करणाऱ्या महिलेसोबत भास्कर जाधव यांनी अरेरावी केली. आमदारांचा सहा महिन्यांचा पगार दिला नाही तरी काही फरक पडत नाही सांगत महिलेच्या मुलाला आईला समजाव असं सांगतानाचा त्यांचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. दरम्यान या संपूर्ण वादावर महिलेने एबीपी माझाशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

महिलेसोबत अरेरावी केल्यानंतर झालेल्या वादावर भास्कर जाधवांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

स्वाती भोजने असं या महिलेचं नाव आहे. स्वाती यांनी भास्कर जाधव यांची बाजू घेताना ते उद्धटपणे बोलले नाहीत असं म्हटलं आहे. “अजूनही आमच्याकडे लाईट नाही, मोबाइल चार्ज नाही त्यामुळे सोशल मीडियावर नेमका काय प्रचार सुरु आहे हे मी पाहिलेलं नाही. पण ते उद्धटपणे बोलले नाहीत. वडिलकीच्या नात्याने बोलले आहेत,” असं स्वाती यांनी सांगितलं. त्यांचे आणि आमचे चांगले संबंध आहेत असंही यावेळी त्यांनी म्हटलं.

Video : मुख्यमंत्र्यांसमोरच भास्कर जाधवांची पूरग्रस्त महिलेला दमदाटी; जाणून घ्या नक्की काय घडलं

“त्यांचा आवाजच रावडी राठोडसारखा असल्याने गैरसमज होता. त्यांचं बोलणं कठोर आहे. त्यामुळे चुकीचा अर्थ काढण्याची गरज नाही. माझ्या मुलाला आईची काळजी घे नंतर येऊन भेटतो असं ते म्हणाले. प्रत्येकवेळी ते मदत करतात, येऊन भेटतात,” असंही त्यांनी सांगितलं. “माझ्यावर कोणताही दबाव नाही. दबाव असता तर आमदार, खासदारांचा पगार काढला नसता. त्यांच्याबद्दल वाईट बोलण्याचं काही कारण नाही,” असंही त्यांनी म्हटलं आहे.

भास्कर जाधवांची प्रतिक्रिया

“मला यावर काहीच बोलायचं नाही. लोकांना मदत करणं हाच माझा प्राथमिक हेतू आहे. कालही मला लोकांना मदत करायची होती. ती महिला माझ्या मुलीसारखी होती. तिच्यासोबत किंवा माझ्या नातू किंवा भाचासारख्या असणाऱ्या मुलासोबतही मी बोलायचं नाही आणि तेसुद्धा कोणत्यातरी चॅनेलच्या प्रतिनिधीला विचारुन बोलायचं असेल तर काम कऱणं कठीण आहे. पण ज्यांनी मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला त्याच्यावरच सोशल मीडियावर लोक तुटून पडले आहेत,” असं भास्कर जाधव म्हणाले आहेत.

यावेळी त्यांनी आज आम्ही रस्ता साफ करत असून टीका करणारे कुठे आहेत अशी विचारणा केली. आपण त्यांना फार महत्व देत नाही असंही त्यांनी सांगितलं. जे कोणी हे घडवलं आहे त्याला योग्य वेळेला उत्तर देईन असा इशाराही यावेळी त्यांनी दिला.

भास्कर जाधवांकडून महिलेला अरेरावी : संजय राऊत यांनी टोचले कान; म्हणाले…

“पाहणी करणं हा विषय संपला आहे. उद्धव ठाकरे यांनी स्वत: चिखलात पायी फिरत पाहणी केली आहे. त्यांच्या आदेशानुसार तात्काळ साफसफाई करण्याची मोहीम आम्ही हाती घेतली आहे. त्यासाठी आपल्या मतदारसंघातून ४०० ते ५०० माणसं साहित्य घेऊन येथे पोहोचली आहे. तसंच नानासाहेब धर्माधिकारी यांच्या संस्थेकडून माणसं आली आहेत. याशिवाय डंपर वैगेरे मागवून शहर साफ कऱण्याचं काम सुरु आहे,” अशी माहिती भास्कर जाधव यांनी दिली.