कौटुंबिक वादातून सांगली जिल्ह्यात एका विवाहित महिलेने आपल्या चार वर्षांच्या मुलासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी रात्री उशिरा अमृतवाडी (ता. जत, जि. सांगली) येथे घडली. प्रियंका रामचद्र बाबर (वय २८) असे मृत विवाहितेचे नाव असून मुलाचे नाव आशिष असे आहे. शनिवारी घरात कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर प्रियंका यांनी रागाच्या भरात आत्महत्या केल्याचे पोलिसांना प्राथमिक तपासात दिसून आढळून आले आहे. आज (रविवारी) सकाळी या दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.

प्रियंका यांना ऐश्वर्या (वय ७) व मुलगा आशिष अशी दोन अपत्ये आहेत. त्यांचा रामचंद्र बाबर यांच्याशी १० वर्षांपूर्वी विवाह झाला होता. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या घरात कौटुंबिक वाद सुरू आहेत. शनिवारी याच कारणावरून घरात पुन्हा एकदा कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर प्रियंका या रागाच्या भरात मुलगा आशिषला घेऊन बाहेर गेल्या. प्रियंका यांनी गावातीलच कृष्णा बाबर यांच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. रात्री उशिरा हा प्रकार उघडकीस आला. विहिरीतून सर्व पाणी बाहेर काढल्यानंतर रविवारी सकाळी दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. याप्रकरणी जत पोलिसांत नोंद झाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.