हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील सिनगी येथील एका शेततळय़ात बुडून माय-लेकराचा बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. जिजाबाई विठ्ठल मगर (वय ४५) व प्रभाकर विठ्ठल मगर (वय २२) अशी मृतांची नावे आहेत. आपल्याच शेतात काम करण्यासाठी प्रभाकर व जिजाबाई हे गेले होते. दुपारच्या सुमारास प्रभाकरला तहान लागली. पाणी पिण्यासाठी म्हणून तो शेततळय़ावर गेला. तेथे पाय घसरून तो तलावात पडला. हे लक्षात येताच प्रभाकरला वाचविण्यासाठी जिजाबाईंनी शेततळय़ात उडी घेतली. या दोघांनाही पोहता येत नव्हते. त्यामुळे दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. याची माहिती मिळताच आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे आपल्या पथकासह घटनास्थळावर पोहोचले. सायंकाळपर्यंत घटनास्थळाचा पंचनामा करून दोघांचे पार्थिव उत्तरीय तपासणीसाठी आखाडा बाळापूरला पाठविण्याची प्रक्रिया सुरू होती.