भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीत बदल करण्यात आला असून इंग्लंडविरोधीतील सामन्यात भारतीय संघ नव्या जर्सीत दिसणार आहे. निळ्या रंगाची जर्सी वापरणारा भारतीय संघ भगव्या जर्सीत दिसणार आहे. दोन्ही संघाच्या जर्सीचा रंग निळा असल्याने हा बदल करण्यात आला आहे. मात्र यावरुन समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना दोषी धरत भारतीय संघाला भगवा रंग देण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे.

अबू आझमी यांनी म्हटलं आहे की, ‘भारतीय संघ ज्याप्रकारे कामगिरी करत आहे त्याची प्रशंसा आहे. पण मोदी सरकार देशाचं भगवीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत. देशात कोणताही विकास केला नाही, बेरोजगारी वाढत चालली आहे, महागाई वाढली आहे, डॉलरचा भावही वाढत आहे. लोकांनी अशा परिस्थितीत मोदींना निवडून दिलं याचं आश्चर्य वाटत आहे’.

पुढे त्यांनी म्हटलं आहेत की, ‘एका मुस्लिम व्यक्तीने भारतीय झेंड्याला रंग दिला होता हे विसरु नये. जर संघाला एखादा रंग द्यायचा असेल तर तो तिरंग्याचा द्यायला हवा. भगवा रंग देणं चुकीचं आहे. जनेतेने याचा विरोध केला पाहिजे’.