चंद्रपूर भारतात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. साप हा शेतकऱ्यांचा मित्र समजला जातो. पावसाळ्यात शेतीची कामे सुरु होतात. शेतामध्ये बहुतांश वेळा सापाचे भ्रमण असते. अशा वेळेस अनेक लोकांचा शेतामध्ये व गावांत सर्पदंशाने मृत्यू होण्याच्या घटना घडतात. सर्पदशांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसते आहे. परिसरात नाग, घोणस, मण्यार, फुरण इत्यादी अतिविषारी साप असून यामुळे अनेक लोकांच्या उपचाराअभावी अथवा वेळेअभावी मृत्यू झाल्याच्या घटना घडत असतात. त्यात मोठ्या प्रमाणात कुटुंबांना त्रास सोसावा लागतो. या बाबी लक्षात घेता, आंतरराष्ट्रीय सर्प दिनाचे औचित्य साधून, सर्पदंशाने दगावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना१० लाखांची मदत देण्यात यावी, अशी महत्वपूर्ण मागणी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी वनमंत्री संयज राठोड यांच्याकडे केली. राज्य शासनाने २०१८ ला वाघ, बिबट, अस्वल, लांडगा, कोल्हा, मगर, हत्ती यांच्या हल्यात मनुष्याचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना १५ लाखांची मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण त्या शासन निर्णयामध्ये साप, विंचू यांचा उल्लेख नसल्याने सापांमुळे मृत्यू झाल्यास कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत दिली जात नाही. अशा परिस्थितीत कोणत्याही मदतीविना ते कुटुंब असहाय्य होते. काही वेळा संपूर्ण संसार उध्वस्त होतो. त्यामुळे सापाचा वन्य जीवांच्या यादीत समावेश करून सर्पदंशाने दगावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना १० लाखांची आर्थिक मदत महाराट्र शासनाने जाहीर करावी, अशी मागणी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केली आहे.