राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी अमरावती येथील त्यांच्या निवासस्थानी गौरी आवाहन केले. महालक्ष्मीची स्थापना करून महालक्ष्मीकडे राज्याच्या सुख-समृद्धीसाठी साकडे घातले. यावेळी त्यांनी राज्यातील महिला अत्याचारांच्या घटना थांबू दे अशी देखील प्रार्थना केली.

“राज्यातील माय भगिनींच्या पोषणासाठी, सशक्तीकरणासाठी, सक्षमीकरणासाठी झुंजण्याचे बळ दे. महिलांवरील अत्याचार थांबू दे, सगळ्यांना सुबुद्धी दे माय, भगिनींच्या रक्षणासाठी सरकारचे हात अधिक मजबूत कर.” असं साकडं त्यांनी महालक्ष्मी मातेला घातलं.

तसेच,”आदिमाया, आदिशक्ती, महालक्ष्मी राज्यातील प्रत्येक माणसाच्या घरात धनधान्य, सुखसौख्य, समृद्धी नांदू दे यंदा पाऊसकाळ चांगला झालाय अशीच तुझी कृपा राहू दे, अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना लढण्याचं बळ दे. बळीराजाला जसं पावसाचं दान दिलं, तसंच राज्यातील कोविडची महामारी लवकरात लवकर दूर कर केंद्रातल्या सरकारने वाढलेली महागाई आणि बेरोजगारी लवकरात लवकर कमी कर”. अशा देखील यशोमती ठाकूर यांनी प्रार्थना केली.