तालुक्यातील पळशी येथील अण्णासाहेब हरिभाउ गागरे वय ३२ या तरुण शेतकऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. नाजूक प्रकरणास कंटाळून अण्णासाहेब यांनी आत्महत्येचे पाउल उचलले असल्याची माहीती पोलिस तपासात पुढे आली आहे. दरम्यान, मृताच्या खिशात चिठ्ठी सापडली असून त्यात काही व्यक्तींची नावे आढळून आल्याचेही सांगण्यात आले. शनिवारी सकाळी अण्णासाहेब झोपेतून उठले नाहीत म्हणून घराची खिडकी उघडून डोकावले असता त्यांनी पत्र्याच्या छताच्या पाईपला दोरीच्या मदतीने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. उपसरपंच अप्पासाहेब शिंदे यांना त्याबाबत माहिती देण्यात आल्यानंतर त्यांनी टाकळीढोकेश्वर दूरक्षेत्राशी संपर्क करून घडलेल्या घटनेची माहीती दिली. पोलिसांनी पळशी येथे जाऊन दरवाजा तोडून अण्णासाहेब यांचा मृतदेह खाली घेतला. टाकळीढोकेश्वर येथे शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर तो नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. दरम्यान अण्णासाहेब यांच्याजवळ सापडलेल्या चिठ्ठीतील हस्ताक्षराची पडताळणी करून त्यातील मजकुराप्रमाणे कारवाई करण्यात येईल, असे साहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांनी सांगितले. साकूर तालुका संगमनेर येथील विहीर ठेकेदार तसेच एक ट्रक ड्रायव्हर अण्णासाहेब यांच्या मृत्यूस कारणीभूत असल्याची माहितीही पुढे आली आहे. सर्व गोष्टींचा बारकाईने तपास करून दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले. मृत अण्णासाहेब यांचे चुलते गंधाधर गणपत गागरेक यांनी दिलेल्या खबरीवरून पारनेर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. विभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील, सहायक पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली टाकळीढोकेश्वर दूरक्षेत्राचे कर्मचारी पुढील तपास करीत आहेत. घातपात झाल्याचा संशय अण्णसाहेब यांनी गळफास घेतला नसून त्यांचा घातपात झाल्याचा संशय काही नातेवाइकांनी व्यक्त केला. परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नातेवाइकांसमक्ष गळफासाने झालेला मृत्यू व घातपाताने झालेल्या मृत्यूची तुलना केल्यानंतर अण्णासाहेब यांचा गळफास घेतल्याने मृत्यू झाला यावर एकमत झाले.