पालघर तालुक्यातील बोईसर येथील एका करोनाबाधित तरुणाचा ठाणे येथे आज सायंकाळी मृत्यू झाला. त्यामुळे पालघर तालुक्यातील  मृतांची संख्या आता तीन वर पोहोचली आहे.

बोईसर दलाल येथे वास्तव्य करणाऱ्या या 35 वर्षीय तरुणाला मुंबई येथे उपचाराकरिता नेत असताना प्रवासादरम्यान करोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर त्याच्यावर प्रथम ठाणे येथील शल्य चिकित्सा रुग्णालयात व नंतर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. गेले काही दिवस या रुग्णास  व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे. अखेर त्याचा आज सायंकाळी  मृत्यू झाला.

यापूर्वी उसरणी येथील एका पन्नास वर्षीय व्यक्तीचा 31 मार्च रोजी मृत्यू झाला होता. तसेच मुंबई सायन येथून पालघर येथे काही दिवसांकरिता वास्तव्यासाठी आलेल्या एका महिलेचा या 12 एप्रिल रोजी सायन येथे मृत्यू झाला होता. शिवाय, तसेच वसई ग्रामीण येथील दोन नागरिकांचाही यापूर्वी मृत्यू झाला आहे.