अहेरी तालुक्यातील कमलापूरजवळच्या कोळसेगुडा येथील पोलिस पाटलाचा मुलगा रवींद्र सुंकरी (२५) याचे नक्षलवाद्यांनी अपहरण केल्याने खळबळ उडाली आहे. नक्षलवादी रात्री एक वाजता सुंकरी यांच्या घरी आले व मुलाला घेऊन जंगलात निघून गेल्याची माहिती सूत्रांनी दिली.  मात्र, या अपहरणासंदर्भात कमलापूर किंवा अहेरी पोलीस ठाण्यात कुठल्याही प्रकारची तक्रार नाही. या संदर्भात गडचिरोलीचे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्याशी संपर्क साधला असता अपहरणाची चर्चा आहे. मात्र, या संदर्भात कुठलीही तक्रार पोलीस ठाण्यात आली नसल्याची माहिती त्यांनी दिली. कोळसेगुडा हे नक्षलग्रस्त गाव असल्यामुळे सुंकरी यांची नक्षलवाद्यांनी हत्या तर केली नसावी, अशीही भीती व्यक्त केली जात आहे.