प्रेमप्रकरणात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या युवा सेनेच्या पदाधिकाऱ्याला आपला जीव गमवावा लागला. खानापूर तालुक्यातील जाधववाडी येथे ही घटना घडली असून या प्रकरणी विटा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आहे. आकाश भगत (वय २१) असे या पदाधिकाऱ्याचे नाव आहे.

खानापूर येथे राहणाऱ्या  प्रमोद कदम (वय २२) या तरुणाचा आदिनाथ दिलीप भोसले (वय २१) या तरुणाशी वाद होता. प्रेमप्रकरणावरुन हा वाद होता. हा वाद मिटवण्यासाठी आदिनाथने प्रमोदला जाधववाडीत बोलावले होते. प्रमोदसोबत खानापूरमधील युवा सेनेचा तालुका अध्यक्ष आकाश भगत, विपूल जाधव आणि अन्य दोघे जण जाधववाडीत पोहोचले. तिथे पोहोचल्यावर वाद मिटण्याऐवजी चिघळला. बाचाबाचीदरम्यान, आदिनाथने विपुल जाधव याच्यावर चाकू हल्ला केला. या हल्ल्यात विपुल जखमी झाला. आकाशने आदिनाथ आणि त्याच्या साथीदारांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी आकाशच्या छातीवरही वार केला. यात आकाश गंभीर जखमी झाला आणि तो जागीच कोसळला. यानंतर आदिनाथ आणि त्याचे साथीदार तिथून पळाले. जखमी आकाशला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तोवर त्याचा मृत्यू झाला होता.  या प्रकरणी पोलिसांनी आदिनाथसह तीन जणांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना २१ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.