पक्षादेश डावलून विधानसभा निवडणुकीत बंडखोरी केलेल्या १४ बंडखोरांची भाजपाने आतापर्यंत हकालपट्टी केली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीत पक्षातील नाराज नेते अपक्ष म्हणून निवडणूक लढवीत आहेत. अनेक प्रयत्न करूनही त्यांनी उमेदवारी मागे न घेतल्यामुळे भाजपाने त्यांच्यावर कारवाई केली आहे. राज्यात शिवसेना-भाजपाविरोधात ५०-६० बंडखोर उभे असताना अजून सर्व भाजपा बंडखोरावर कारवाई झालेली नाही. गुरूवारी भाजपाने चार तर शुक्रवारी सहा जणांवर बडतर्फाची कारवाई केली आहे. आतापर्यंत भाजपाने १४ बंडखोरावर कारवाई केली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी भाजपा- सेना महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकृत उमेदवारांविरोधात बंडखोरी करणा-यांना मागे घेण्याचे आवाहन केले होते जर त्यांनी तसे जाहीर केले नाही तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल व निवडणूकीत त्य़ांचा पराभव केला जाईल असा इशारा दिला होता. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेही व्यासपीठावर उपस्थित होते.त्यानंतर आज पाटील यांनी हे कारवाईचे पाऊल उचलले आहे. या बंडखोर नेत्यावर झाली कारवाई - विनोद अग्रवाल, गोंदिया - सीमा सावळे, पिंपरी चिंचवड - सतीश होले, दक्षिण नागपूर - अशोक केदार, मेळघाट - गुलाब मडावी, गडचिरोली - राजू तोडसाम, आर्णी, यवतमाळ - चरण वाघमारे, तुमसर - गीता जैन, मीरा भाईंदर - बाळासाहेब ओव्हाळ, पिंपरी चिंचवड - दिलीप देशमुख, अहमदपूर, लातूर - भाऊराव उके - रतन वासनिक - छत्रपाल तुरकर - अमित बुद्धे