राज्यातील विधानसभा निवडणुक २१ ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्यात एकूण २१ विधानसभा मतदारसंघ असून या जागांसाठी ३७३ जणांनी अर्ज दाखल केले गेले होते. तर, त्यातील १२७ जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. यामुळे २१ जागांसाठी जिल्ह्यात आता २४६ उमेदवार रिंगणात असणार आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले की, यंदाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करणार्‍या व्यक्तींची संख्या अधिक होती. त्यामध्ये जिल्ह्यातील पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ५८ जणांनी अर्ज दाखल केला होता, त्यापैकी ३० जणांनी माघार घेतली आहे. यामुळे आता या मतदारसंघात २८ उमेदवार रिंगणात असणार आहेत. सर्वात कमी आंबेगाव विधानसभा मतदारसंघात ९ जणांनी अर्ज दाखल केला आहे. तर तिघांनी अर्ज मागे घेतल्याने, या मतदारसंघात केवळ ६ उमेदवार निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच ते पुढे म्हणाले की, उमेदवाराची संख्या आज निश्चित झाली असून आता या संपूर्ण जिल्ह्यात ७७ लाख २९ हजार २१७ नागरिक मतदान करणार आहेत. तर मतदान आणि मतमोजणी दरम्यान ४१ हजार अधिकारी आणि कर्मचारी काम पाहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

कसबा मतदारसंघात बूथ अॅपद्वारे मतदाराची अचूक माहिती मिळणार –

निवडणुकीच्या मतदान करतेवेळी, आवश्यक असणारी कागदपत्रे जवळ नसल्यास अनेकांना मतदानापासून वंचित राहावे लागते. या पार्श्‍वभूमीवर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आता कसबा विधानसभा मतदारसंघात असणार्‍या मतदारांसाठी मतदानच्या स्लीपवर असलेल्या कोडवर मतदान केंद्रावरील अधिकार्‍यांनी बूथ अॅपच्या सहाय्याने स्कॅन केल्यास, सबंधित व्यक्तिची माहिती मिळण्यास मदत होणार आहे. अशा प्रकाराच्या अॅपमधून मतदारांना सुविधा पुरवणारा कसबा मतदार संघ राज्यातील पहिला मतदारसंघ ठरला असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.