महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठी आज दिवसभर मतदान पार पडले. शहरी आणि ग्रामीण भागात मतदानाचा उत्साह दिसून आला. मात्र या दोन्हीची तुलना केल्यास शहरी भागात कमी आणि ग्रामीण भागात मतदानाचा उत्साह जास्त दिसून आला. निवडणूक आयोगाने संध्याकाळी ६ पर्यंत झालेल्या मतदानाची ही आकडेवारी आहे. २८८ मतदारसंघात एकूण ६०.४६ टक्के मतदान झालं. पाच वर्षांपूर्वी म्हणजेच २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ६३.१३ टक्के मतदान झालं होतं. त्या तुलनेत हे प्रमाण ३ टक्क्यांनी घसरल्याचं पाहण्यास मिळालं. या मतदानादरम्यान EVM आणि VVPAT बाबत ३६१ तक्रारी दाखल झाल्या आहेत. तर २ निवडणूक अधिकाऱ्यांचा मृत्यूही झाल्याची बाब समोर आली आहे. करवीरमध्ये ८३.२० टक्के मतदान झालं आहे. तर कुलाबा या ठिकाणी ४० टक्के मतदान झालं आहे. करवीरप्रमाणेच कागलमध्ये ८०.१३ टक्के, शाहूवाडीमध्ये ८०.१९ टक्के, शिराळा या ठिकाणी ७६.७८ टक्के, तर राधानगरीमध्ये ७५.५९ टक्के अशी मतदानाची टक्केवारी पाहण्यास मिळाली. तर कुलाब्याप्रमाणे कल्याण पश्चिममध्ये ४१.९३ टक्के, अंबरनाथमध्ये ४२.४३ टक्के, उल्हासनगरमध्ये ४१ टक्के, वर्सोवा या ठिकाणी ४२.६६ टक्के आणि पुणे कॅन्टॉनमेन्ट या ठिकाणी ४२.६८ टक्के अशी मतदानाची अल्प टक्केवारी पाहण्यास मिळाली. निवडणूक आयोगानेच ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. २०१४ च्या तुलनेत मतदानाचा टक्का ३ टक्क्यांनी घसरला असल्याचं दिसून आलं आहे. आता निकालाच्या दिवशी काय घडणार ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद झालं आहे. आता सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे ती निकालाच्या दिवसाची. गुरुवारी निकाल लागणार आहे. महाराष्ट्रात कुणाचं सरकार येणार हे त्याच दिवशी स्पष्ट होईल.