फक्त मुंबईचाच नाही तर महाराष्ट्राचा रिमोट हाती घेणार आणि आदित्य ठाकरेंचा वरळीत पराभव करणार असा विश्वास वरळीतून आदित्य ठाकरेंविरोधात अर्ज दाखल केेलेल्या अभिजीत बिचुकलेंनी व्यक्त केला आहे. मुंबईकरांनी मला बिग बॉसमध्ये ज्याप्रमाणे साथ दिली अगदी तशीच साथ मुंबईकर मला मतदानादरम्यान देतील असंही अभिजीत बिचुकलेने म्हटलं आहे. कोल्हापुरात अभिजीत बिचुकलेने अंबाबाईचं दर्शन घेतलं त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना मुंबईकर मला नक्की निवडून देतील असं अभिजित बिचुकलेनं म्हटलं आहे.

प्रचारासाठी तुमची रणनीती काय असं विचारलं असता, चिन्ह आल्यावर मी या सगळ्या गोष्टी स्पष्ट करेन असं अभिजीत बिचुकलेंनी सांगितलं. वरळीत सध्या ठाकरेेंची हवा आहे याबाबत विचारलं असता आपण हवा निर्माण करत नाही हवा काढून घेतो असंही बिचुकले म्हणाले. माझ्यामुळे वरळीची निवडणूक रंगतदार झाली आहे. मी आज महालक्ष्मीच्या चरणी लीन होऊन आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे असंही त्यांनी सांगितलं.

आदित्य ठाकरेंविरोधातला हा सामना रंगतदार होणार आहे आणि मला कुणीही रोखू शकत नाही असंही अभिजीत बिचुकलेंनी सांगितलं. भगवं वादळ दिसून येतं आहे त्याबाबत काय सांगाल ? असं विचारलं असता असली वादळं अभिजीत बिचुकलेसमोर काहीही नाहीत असं त्यांनी म्हटलं आहे. तसंच सातारा माझी गादी आहे मीच शिवरायांचा खरा वंशज आहे, कारण मी त्यांचा वैचारिक वारसा मीच लढवतो आहे. मात्र मला मुंबईतून लढण्याची इच्छा असल्याने मी आदित्य ठाकरेंच्या विरोधात अर्ज दाखल केला आहे असंही बिचुकले यांनी स्पष्ट केलं.

कोण आहे आदित्य ठाकरे ? आदित्य ठाकरेंना जनतेने पाठिंबा दिला आहे म्हणून ते आदित्य ठाकरे आहेत. जनतेशिवाय त्यांचं अस्तित्व शून्य आहे. बिग बॉस सुरु असताना मी सतत चार दिवस ट्रेंडिंगमध्ये होतो. मुंबईकरांनी त्यांच्या बिझी दिवसातून मला वेळ दिला. मला नक्की खात्री आहे की यावेळी वरळीतून मुंबईकर मला निवडून देतील असंही बिचुकले यांनी म्हटलं आहे.