राज्यातील सत्तासंघर्ष शिगेला पोहचला आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येण्याची चिन्ह असताना अचानक शनिवारी सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने, राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला. याविरोधात महाविकास आघाडीच्या तिन्ही प्रमुख पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत, याचिका सादर केली. त्यावर काल सुनावणी झाली तसेच आजही सुनावणी होत आहे. मात्र तत्पूर्वी काल रात्री उशीरा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली. या भेटीत मंत्रिपदांबाबत चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. एवढेच नाहीतर अजितदादांच्या गटाला १२ मंत्रीपदं १५ महामंडळं दिली जाणार असल्याची देखील माहिती सूत्रांच्या माध्यमातून समोर आली आहे.

अजित पवार यांच्या पाठीशी २७ आमदार असल्याचा दावा भाजपाकडून करण्यात आलेला आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवारांच्या पाठिंब्याने भाजपा बहुमत सिद्ध करु शकलं आणि सरकार स्थापना झाली तर अजितदादांच्या गटाला १२ मंत्रीपदं १५ महामंडळं दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांच्या माध्यमातून समोर येत आहे. या भेटीत भाजपा आणि राष्ट्रवादीचे सरकार बनणार असल्याचा विश्वास देखील व्यक्त करण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे. तर, भाजपाने मात्र ही बैठक फक्त बहुमत सिद्ध करण्यासंबंधी तसंच सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीसंदर्भात होती अशी माहिती दिली. याशिवाय भाजपा सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवारांसोबत युती करण्याआधीच मंत्रीपदात मिळणाऱ्या वाट्यासंबंधी चर्चा झाली होती.

राज्यातील सत्तासंघर्षांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात आज पुन्हा सुनावणी होणार असून सरकार स्थापण्याच्या प्रक्रियेबाबत सर्व कागदपत्रे सादर करण्याचा आदेश न्यायालयाने महाधिवक्ता तुषार मेहता यांना रविवारी दिला. दरम्यान सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रात्री उशिरा वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. जवळपास ४० मिनिटं दोघांमध्ये चर्चा सुरु होती. यावेळी दोघांमध्ये सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीसंदर्भात तसंच अजित पवारांच्या गटाला मंत्रीपदात मिळणारा वाटा यासंदर्भात चर्चा झाली असल्याचं सांगितलं जात आहे.