पाच वर्षांपूर्वी मी जी विकासकामे केलेली आहेत त्या कामांना नव्या रंगात, नव्या ढंगात सजवून स्वतःच्या नावावर खपवली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आणि अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार नवाब मलिक यांनी केला आहे.

नवाब मलिक यांनी गुरुवारी मांडला गाव, लेबर कॉलनी आणि टीएफआर याठिकाणी पदयात्रा काढत मतदारांशी संवाद साधला, यावेळी ते बोलत होते. मलिक म्हणाले, इथल्या लोकांची मुख्य समस्या पाणी आहे. मी जेव्हा या भागाचे प्रतिनिधित्व करत होतो त्यावेळी मी नवीन पाण्याची पाईपलाईन टाकून पाण्याची समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला होता. याशिवाय झोपडपट्टीमध्ये अनेक असुविधा होत्या त्या सोडवण्याचा प्रयत्न केला होता.

इथल्या लोकप्रतिनिधींनी लोकांच्या समस्या सोडवलेल्या नाहीत. काहीअंशी त्या सोडवल्या असे दाखवले मात्र मी केलेल्या विकासकामांच्या पाट्या बदलून कामे दाखवली असा आरोप नवाब मलिक यांनी यावेळी केला.

यावेळी मी लोकांपर्यंत पोचलो आहे. ज्या पध्दतीने माझं स्वागत मतदारसंघातील झोपडपट्टी आणि विभागात केले जात आहे यावरुन लोकांना अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघात बदल हवा असल्याचे स्पष्ट होते आणि हा बदल राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने असेल असे ते म्हणाले.