निवडणुकीचे निकाल लागून आता आठवड्यापेक्षा अधिक कालावधी झाला आहे. त्यातच सत्तावाटप आणि मुख्यमंत्रिपदाचा तिढाही अद्याप सुटलेला नाही. अशातच एका तरूणानं आता अनोखी मागणी केली आहे. मुख्यमंत्रिपदाचा तिढा सुटत नाही तोवर मुख्यमंत्रिपदाचा पदभार माझ्याकडे सोपवा अशी मागणी बीडच्या एका तरूणानं राज्यपालांकडे केली आहे. श्रीकांत गदळे असं या तुरूणाचं नाव आहे.

निवडणुकीच्या निकालानंतर भाजपा हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यांना १०५ जागांवर विजय मिळाला. तर शिवसेना हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. शिवसेना भाजपानं युतीत निवडणूक लढवली असली तरी सत्तेचं वाटप आणि मुख्यमंत्रिपदावरून दोन्ही पक्षांमध्ये एकमत होताना दिसत नाही. अशातच बीडच्या श्रीकांत गदळे या तरूणानं मुख्यमंत्रिपदाचा तिढा सुटेस्तोवर पदभार आपल्याकडे सोपवण्यात यावा अशी मागणी राज्यपालांकडे केली आहे.


मी शेतकरी कुटुंबातील असून गेल्या १० ते १२ वर्षांपासून राजकरणात आणि समाजकारणात अग्रेसर आहे. तसंच गोरगरीबांच्या प्रश्नावर सातत्त्यानं कामदेखील करत आहे. राज्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. भाजपा आण शिवसेना यांच्या मुख्यमंत्रिपदाचा तिढा निर्माण झाल्यानं राज्यातील शेतकरी वर्ग आणि सर्वसामान्य चिंतेत आहेत. त्यामुळे हा तिढा सुटेस्तोवर मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी आपल्याकडे सोपवण्यात यावी अशी मागणी गदळे यांनी पत्राद्वारे केली आहे. तसंच आपल्या निवदेनाची दखल न घेतल्यास लोकशाही मार्गानं आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.