|| विकास महाडिक विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक यांनी केलेला भाजपा प्रवेश नवी मुंबईतील राजकीय सारीपाट ढवळून काढणारा आहे. राज्यात शिवसेना भाजपा युतीबद्दल अद्याप साशंकता आहे. युती झाल्यास नवी मुंबईतील एक विधानसभा जागा मित्रपक्ष शिवसेनेला सोडावी लागणार आहे. आमदारकीचा राजीनामा देऊन पक्षात आलेल्या संदीप नाईक यांच्यासाठी भाजपा ऐरोली मतदार संघावर दावा कायम ठेवणार आहे. हा मतदार संघ या अगोदर राष्ट्रवादीचा होता. त्यामुळे त्यावरील दावा सोडण्यास शिवसेनेला फारसे जड जाणार नाही, मात्र बेलापूर मतदार संघांवरून युतीमध्ये धुसफूस होणे शक्य आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांना ८४ हजार मतांचे मतधिक्य लाभले आहे. यात भाजपाची तीस-पस्तीस हजार मते गृहीत धरली तरी त्यापेक्षा मतधिक्य शिवसेनेचे जास्त आहे. त्यामुळे नवी मुंबईतील किमान एका जागेवर शिवसेना आपला दावा कायम ठेवणार आहे. तो दावा बेलापूर मतदार संघावर राहणार आहे. युतीत ही जागा शिवसेनेच्या वाटय़ाला आल्यास भाजपाच्या विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांचा पत्ता कापला जाणार आहे. मंदा म्हात्रे यांचा पत्ता कापल्याने आमदारकीसाठी भाजपा प्रवेश करणाऱ्या नाईकांचा प्रश्नच निकाली निघणार आहे. या दोघां भाऊ-बहिणींना शिवसेनेच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी काम करावे लागणार आहे. ते तसे कठीण आहे. बेलापूरच्या आमदार कोण आहेत यापेक्षा ती भाजपाची जागा असल्याने भाजपा ही जागा सहजासहजी सोडणार नाही. हमखास निवडून येणारी जागा शिवसेनेला सोडण्यास भाजप राजी होणार नाही. त्यामुळे ही जागा शिवसेनेला सोडण्याचा प्रश्न येत नाही असे भाजपाच्या नेत्यांचे ठाम मत आहे. या मतदार संघातील संभाव्य उमेदवारांची राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत रविवारी मुलाखत घेण्यात आली. यात विद्यमान आमदार म्हात्रे व स्थानिक अध्यक्ष रामचंद्र घरत होते. नाईक या पूर्व परीक्षेला बसलेले नाहीत हे विशेष. भाजपाने ही जागा टिकवून ठेवल्यास ठाणे जिल्ह्य़ाचे नेते म्हणून पक्षात घेतलेल्या नाईक यांना ती दिली जाईल की विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांना इतकाच हा प्रश्न अनुत्तरित आहे. युती फिस्कटल्यास नवी मुंबईत तिरंगी लढती होणार आहेत. ऐरोली मतदार संघासाठी शिवसेनेला नवीन उमेदवाराचा शोध घ्यावा लागणार आहे. यापूर्वी एक वेळ खासदारकी व दोन वेळा आमदारकीची उमेदवारी देऊन पराभवाचा शिक्का माथी मारलेल्या विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांना ही उमेदवारी देण्याच्या विरोधात शिवसैनिक आहेत. गेली अडीच वर्षे भाजपाबरोबर जवळीक साधलेल्या चौगुले यांचा एक पाय भाजपाच्या उंबरठय़ावर असल्याचे जगजाहीर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मागे असलेल्या समाजाचा जमाव बघून वडार समितीच्या सभापतीचे गाजर दिले आहे. भाजपाच्या वळचणीला गेलेल्या चौगुले यांचे शिवसेनेने पालिकेतील विरोधी पक्षनेते पद अद्याप कायम ठेवले असल्याने शिवसैनिकात कमालीची नाराजी आहे. या चौगुलेंची जागी ऐरोलीत नवीन उमेदवाराचा शोध सुरू आहे. बेलापूरमध्ये पुन्हा तोच प्रश्न निर्माण होणार आहे, मात्र २०१४ मध्ये मोदी लाटेत आलेली ही जागा पुन्हा याच लाटेवर स्वार होईल याची खात्री नाही. शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय स्वतंत्र भाजपासाठी नवी मुंबईतील दोन जागा टिकविणे कठीण असून या दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होण्याची शक्यता आहे. नाईकांच्या भाजपा प्रवेशनंतर अनेकांची राजकीय गणिते बदलली आहेत. ठाण्याच्या नड्डा यांच्या सभेत नाईक यांना व्यासपीठावरून पाय उतार व्हावे लागले यातून या पक्षात नाईक म्हणतील ते धोरण आणि तोरण ठरणार नसल्याचे संकेत आहेत. त्यामुळेच भाजप नगरसेवकांच्या पाठिंब्यावर राष्ट्रवादीचा महापौर कायम ठेवला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर पालिकेतील राजकीय शिमगा रंगणार आहे.