भाजपाध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू काश्मीरधून हटवण्यात आलेल्या ३७० कलमचा उल्लेख करत राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मतांच्या लालसेपोटी शरद पवारांना मोतीबिंदू झाला आहे असं अमित शाह यांनी म्हटलं आहे. राजुरा येथे आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी हिंमत असेल तर राहुल गांधी आणि शरद पवार यांनी आम्ही सत्तेत आल्यानंतर ३७० कलम पुन्हा आणू असं बोलून दाखवावं असं आव्हान दिलं आहे.

यावेळी अमित शाह यांनी ३७० कलम हटवण्यावरुन टीका करणाऱ्यांना उत्तर देत आमच्यासाठी देशासाठी सुरक्षा महत्त्वाची आहे असं सांगितलं. “हा छत्रपती शिवाजी महाराज, वीर सावरकर आणि टिळकांचा प्रदेश आहे. येथेच स्वराज्यासाठी लढाई सुरु झाली होती. आणि हे लोक आम्हाला महाराष्ट्र आणि ३७० चा काय संबंध अशी विचारणा करतात. पवारजी तुम्हाला मोतीबिंदू झाला आहे. मतांच्या लालसेपोटी तुम्हाला राज्यातील लोकांना काय हवं आहे हेदेखील माहिती नाही,” असं अमित शाह यांनी म्हटलं आहे.

अमित शाह यांनी पुन्हा एकदा राज्यात आमचंच सरकार येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. तसंच भाजपा कार्यकर्ते एक दिवस आधीच २४ ऑक्टोबरला राज्यात दिवाळी साजरी करतील असं त्यांनी म्हटलं. अमित शाह यांनी राहुल गांधी आणि शरद पवारांवर शरसंधान साधलं. “महाराष्ट्रात एकीकडे भाजपा जिथे मोदींच्या नेतृत्त्वातील देशभक्तांचा पक्ष आहे तर दुसरीकडे राहुल गांधी आणि शरद पवारांची घराणेशाही असणारा पक्ष आहे,” अशी टीका अमित शाह यांनी केली.

यावेळी अमित शाह यांनी सरकारने आदिवासींसाठी केलेल्या कामांची माहिती दिली. तसंच मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयांचा उल्लेख करताना तिहेरी तलाकवरही भाष्य केलं. तिहेरी तलाक रद्द केल्याने देशातील करोडो महिलांना सुरक्षा देत सन्मान वाढवला आहे असं अमित शाह यांनी सांगितलं.