उद्धव ठाकरे यांनी गुरूवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर सहा आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. परंतु आता या शपथविधी सोहळ्यावरही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. महाविकास आघाडीचा शपथविधी हा बेकायदेशीर असल्याचा आरोप भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी केला. तसंच याविरोधात राज्यपालांकडे एकाने याचिका दाखल केली असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

महाविकास आघाडीचा शपथविधी हा बेकायदेशीर आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीदेखील त्यांना अनेकदा टोकलं. शपथविधीचीही एक पद्धत असते. त्यानुसारच शपथ घ्यावी लागते. परंतु नव्या सरकारकडून ठरलेल्या पद्धतीनुसार शपथ घेण्यात आली नाही, असं चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले. तसंच याविरोधात राज्यपालांकडे याचिका दाखल केली आहे. तसंच त्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणीही केली आहे. राज्यपालांनी यावर योग्य ती कारवाई न केल्यास सर्वोच्च न्यायालयातही याविरोधात याचिका दाखल होऊ शकते, असं ते म्हणाले.

नव्या सरकारकडून नियम धाब्यावर बसवून काम करण्यात येत आहे. राज्यपालांकडून हंगामी अध्यक्षांची निवड झाल्यानंतर पुन्हा मतदानाद्वारे अध्यक्ष निवडेपर्यंत तेच अध्यक्ष म्हणून काम पाहतात. त्यांना बदलता येत नाही. परंतु नव्या सराकरनं कालिदास कोळंबकर यांना हटवून त्यांच्या जागी वळसे-पाटील यांची नियुक्ती केली आहे. काल त्यांनी अध्यक्षपदाची शपथही घेतली. त्यातच आज विश्वासदर्शक ठराव आणि उद्या अध्यक्षपदाची निवडणूक असं पहिल्यांदाच घडत असल्याचं पाटील म्हणाले. अध्यक्षपदाची निवडणूक ही गुप्त मतदानानं न करता उघडपणे होत आहे. ही नियमांची पायमल्ली असल्याचं त्यांनी सांगितलं.

आम्ही समर्थपणे विरोधी पक्षात राहून लढायला तयार आहोत. आमच्या शुभेच्छाही नव्या सरकारसोबत आहेत. परंतु त्यांनी नियम पाळायला हवेत. आमचं मन मोठं आहे. आम्ही उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून स्वीकारलं आहे. त्यांनी नियमांप्रमाणं काम करावं. नियमांबाहेर जाऊन काम केल्यास आम्ही त्यांना काम करून देणार नाही, असंही ते म्हणाले.