महाराष्ट्रामधील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. राज्यामधील घोडेबाजार थांबवण्यासाठी लवकरात लवकर बहुमत चाचणी घेणे गरजेचे असल्याचे सांगत न्यायलयाने उद्या म्हणजेच २७ नोव्हेंबर रोजी बहुमत चाचणी घेण्यास सांगितलं आहे. उद्या पाच वाजेपर्यंत आमदारांचा शपथविधी पूर्ण करण्यात यावा असंही न्यायालयाने सांगितलं आहे. तसंच विश्वासदर्शक ठरावाचे लाईव्ह चित्रीकरण करण्यात यावं असं न्यायालयाने सांगितलं आहे. भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी आम्ही तयार असून, उद्या विधानसभेत बहुमत सिद्ध करुन दाखवू असा विश्वास व्यक्त केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आपण आदर करत असल्याचंही यावेळी त्यांनी सांगितलं आहे.

आणखा वाचा- आमच्याकडे काल १६२ होते, बहुमत चाचणीवेळी १७० असतील – संजय राऊत

“लोकशाही मूल्यांचं रक्षण होणं आवश्यक आहे. लोकांना चांगलं सरकार मिळणं हा मुलभूत अधिकार आहे. तसंच घोडेबाजार रोखण्यासाठी न्यायालयाला काही आदेश देणं गरजेचं आहे. त्यामुळे कोणतेही गुप्त मतदान न घेता उद्या (२७ नोव्हेंबर) सायंकाळी पाच वाजेपर्यंत बहुमत चाचणी घेण्याचा आदेश आम्ही देत आहोत,” असं न्यायाधिशांनी स्पष्ट केलं. बहुमतासाठी घेण्यात येणारे मतदान हे गुप्त पद्धतीने न घेता ते थेट घेण्यात यावे तसेच या मतदानाचे लाइव्ह टेलिकास्ट करण्यात यावे असंही न्यायलयाने स्पष्ट केलं आहे. संबंधित निकाल देताना न्यायलयाने बहुमत चाचणीसाठी हंगामी व स्थायी अध्यक्षांची नेमणूक करून आमदारांना शपथ देण्याचे आदेश दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातील महत्त्वाचे मुद्दे
– २७ नोव्हेंबरला संध्याकाळी पाच वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करा
– शपथविधी झाल्यानंतर लगेचच बहुमत सिद्ध करण्यात यावं
– गुप्त मतदान नको
– विश्वासदर्शक ठरावाचे लाईव्ह चित्रीकरण करा
– बहुमत चाचणीसाठी प्रोटेम स्पीकर म्हणजेच हंगामी अध्यक्षांची नियुक्ती करा
– हंगामी अध्यक्षच बहुमत चाचणी घेणार