महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर सर्व पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडायला लागल्या आहेत. शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे अनेक उमेदवार घाई-गडबडीत अर्ज दाखल करत आहेत. गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात अनेक नेत्यांनी पक्षांतर करत आपल्या प्रमुख नेत्यांना धक्का दिला. सोशल मीडियावर मनसेचा चेहरा बनलेल्या नितीन नांदगावकर यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे. या घडामोडीवर भाजपने मनसेला चांगल्याच कानपिचक्या दिल्या आहेत.

रम्याचे डोस या सोशल मीडियावर सुरु असलेल्या कँपेनच्या माध्यमातून भाजपने नांदगावकरांच्या पक्षांतरावरुन राज ठाकरेंना डोस दिला आहे.

मनसेच्या खळ्ळ खट्याक स्टाईलमुळे नितीन नांदगावकर हे चर्चेत आले होते. त्यांनी आपल्या माध्यमातून अनेकांना न्यायही मिळवून दिला होता. नुकतंच त्यांनी मुंबईतील टॅक्सी चालकांविरोधात आंदोलन पुकारलं होतं. टॅक्सींमध्ये बटन लावून प्रवाशांच्या होणाऱ्या फसवणुकीबद्दल त्यांनी आवाज उठवला होता. त्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांना दादर रेल्वे स्थानकावर झालेल्या त्रासानंतरही त्यांनी टॅक्सीचालकांना इशारा दिला होता. तसंच आपल्या दरबाराच्या माध्यामातून त्यांनी अनेक लोकांना न्याय मिळवून देण्याचाही प्रयत्न केला होता.

दरम्यान, आपण एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने शिवसेनेत प्रवेश करत असल्याचं नांदगावकर म्हणाले. तसंच उद्धव ठाकरे आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आपण राज्यभर भगवा फडकवणार आहोत. तसंच आता शिवसेनेच्या माध्यमातून आपलं काम सुरू ठेवणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. यापूर्वी मनसेने विधानसभा निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला होता. राज ठाकरे यांनी 100 जागांवर मनसे उमेदवार देणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर मनसेच्या आलेल्या उमेदवारांच्या दोन याद्यांमध्ये नांदगावकर यांना वगळण्यात आलं होतं. त्यामुळेच त्यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.