राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून तीन आठवड्यांचा कालावधी उलटला आहे. परंतु राज्यातील सत्तास्थापनाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. भाजपानं सत्ता स्थापनेसाठी नकार दिला होता. त्यानंतर शिवसेनेलाही आमदारांचे समर्थन पत्र राज्यापालांकडे सादर करण्यास अपयश आले आहे. अशातच भाजपा आणि शिवसेनेमधील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. भाजपाने आता रम्याचे डोसच्या माध्यमातून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाने विरोधकांवर हल्लाबोल करण्यासाठी रम्याचे डोस ही मालिका सुरू होती. याद्वारे भाजपानं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य केलं होतं. आता या माध्यमातून भाजपानं शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. यामध्ये रम्या आणि आणखी एका व्यक्तीचं संभाषण दाखवण्यात आलं आहे. विश्वास म्हणजे काय रे भाऊ ? असा सवाल एक व्यक्ती रम्याला करते. त्यावर १०५ आमदारांना मोकळे सोडणे यालाच विश्वास म्हणतात, असं उत्तर रम्या त्याला देतो. याला म्हणतात विश्वास!!#रम्याचेडोस pic.twitter.com/38LSUwcaoG — भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) November 11, 2019 गेल्या काही दिवसांपासून राज्यातील सत्तास्थापनेचा पेच आणखी वाढला आहे. अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाच्या वाटपावरून शिवसेना भाजपामध्ये दुरावा निर्माण झाला आहे. तसंच गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेनं भाजपावर हल्लाबोल सुरू केला होता.