लोकसभा निवडणुकीत देशाशी संबंधित राष्ट्रीय मुद्दय़ांवर ऊहापोह झालेला असताना आता राज्य विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात देशाचे मुद्दे पुढे करून सत्ताधारी भाजपकडून आपली निष्क्रियता लपवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केला. गेल्या पाच वर्षांत सर्वच क्षेत्रात अपयशी ठरलेल्या या सरकारला आता खाली खेचा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
मावळ विधानसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील शेळके आणि चिंचवडचे राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार राहुल कलाटे यांच्या प्रचार सभांमध्ये बोलताना डॉ. कोल्हे यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला.

“भाजप नेत्यांकडून कलम ३७० चा मुद्दा प्रचारात अग्रस्थानी आहे. त्यामुळे कर्जमाफी, बेरोजगारीसह स्थानिक प्रलंबित प्रश्न सुटणार आहेत का, असा प्रश्न मतदारांनी विचारावा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात, की लढतीत समोर पैलवानच नाही. मग, भाजप नेतृत्वाची सगळी फळी प्रचारात कशासाठी उतरली आहे. २४ ऑक्टोबरला आपल्याला विजयी दिवाळी साजरी करायची आहे. ” अशा शब्दात भाजपावर जोरदार टीका करत अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मतदान करण्याचे आवाहन जनतेला केले.