राज्यातील सत्तासंघर्षाला शनिवारी अगदीच अनेपेक्षित कलाटणी मिळाली. भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ शनिवारी घेतली. अचानक घडलेल्या या शपथविधीमुळे राज्यामध्ये मोठा राजकीय भूकंप झाला. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी या दोन्ही नेत्यांना शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारस शपथ दिली. हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर ‘अजित पवारांनी दिलेलेलं समर्थन हे वैयक्तीक आहे हा राष्ट्रवादीचा पाठिंबा नाही,’ असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलं. मात्र आता विधिमंडळामध्ये बहुमत सिद्ध कऱण्यासाठी पुरेसे संख्याबळ पाठीशी असण्यासंदर्भात भाजपालाच साशंकता असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळेच भाजपाने हलचाली सुरु केल्या आहेत. बहुमत सिद्ध करण्यासाठी अपक्ष आमदारांचा पाठिंबा भाजपाला असणे अत्यावश्यक असल्याने भाजपाने या समर्थक आमदारांना शनिवारीच गुजरात हलवले आहे.

अजित पवारांच्या मदतीने स्थापन केलेल्या भाजपा सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंतचा वेळ देण्यात आला आहे. त्यामुळेच आता बहुमताचा आकडा जुळवून आणण्यासाठी आमदारांची फोडाफोडी होण्याच्या भितीने सर्वच पक्षांनी खबरदारीची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार फूटणार नाही यासाठी काळजी घेतली जात असतानाच भाजपानेही विरोधी आमदारांना गुजरातला हवले आहे. आम्हाला आमच्या आमदारांवर विश्वास असून त्यांना एकत्र ठेवण्याची गरज नसल्याचा दावा भाजपाचे अनेक नेते वेळोवेळी करत असले तरी अपक्ष आमदारांबद्दल भाजपाने सावध पवित्रा घेतल्याचे चित्र दिसत आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या पाच बेपत्ता आमदारांपैकी चारही आमदार सोमवारी सकाळी मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. अजित पवारांबरोबर केवळ अण्णा बनसोडे हे एकमेव आमदार असल्याचे समजते. राष्ट्रवादीच्या ५४ पैकी ५२ आमदारांनी आम्ही शरद पवारांबरोबर असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता ३० तारखेला बहुमत सिद्ध करताना काय होणार यावरच हे सरकार टीकणार की पडणार हे स्पष्ट होईल.