महाविकास आघाडीचं सरकार येणार असल्याच राजकीय वातावरण असतानाच भाजपानं सगळ्यांना आश्चर्यचकित केलं. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केलं. फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीच्या आमदारांच्या पाठिंब्यावर भाजपानं सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं २०१४मधील ट्विट व्हायरल झालं आहे. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी सरकार स्थापनेसाठी प्रयत्न सुरू केले होते. तिन्ही पक्षातील समान कार्यक्रमही ठरला असून, केवळ सत्तास्थापन करण्याचा दावा करण्याची औपचारिकता राहिली होती. मात्र, या सगळ्यांना चकवा देत भाजपानं सत्तास्थापनेचा दावा करत सरकारही स्थापन केलं. राष्ट्रवादीचे विधीमंडळ गटनेते अजित पवार यांनी पक्षाच्या आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र दिल्यानंतर राजभवनात शपथविधी सोहळा पार पडला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. भाजपानं राज्यात सरकार स्थापन केल्यानंतर राजकीय वर्तुळाबरोबरच सोशल माध्यमातून प्रचंड खळबळ उडाली आहे. उलटसुलट प्रतिक्रिया या राजकीय घडामोडीवर व्यक्त होत आहे. दरम्यान, फडणवीस यांचा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर त्यांनी २६ सप्टेंबर २०१४ रोजी केलेलं ट्विट व्हायरल झालं आहे. भाजपा राष्ट्रवादीसोबत आघाडी करणार असल्याची चर्चा सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यावेळी फडणवीस यांनी हे ट्विट केलं होतं. "भाजपा कधीही, कधीही, कधीही राष्ट्रवादीसोबत जाणार नाही. काही हेतूने अफवा पसरवल्या जात आहेत. सगळे शांत असताना आम्ही सभागृहात राष्ट्रवादीचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणला," असं ट्विट फडणवीस यांनी केलं होतं. BJP will never, never, never have any alliance with NCP. Rumours are motivated. We exposed their corruption in assembly. Others were silent. — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 26, 2014 फडणवीस यांच्या त्या ट्विटचा हवाला देत काँग्रेसनेही भाजपावर टीका केली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सिंग सुरजेवाला यांनी टीका केली आहे. सत्तेचा हव्यास तत्व आणि भ्रष्टाचाराला धुवून काढते," असं सुरजेवाला यांनी म्हटलं आहे. सत्ता की हवस सिद्धांत व भ्रष्टाचार धो देती है। pic.twitter.com/WOauooaxfU — Randeep Singh Surjewala (@rssurjewala) November 23, 2019 भाजपानं सरकार स्थापन केल्यानंतर बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली. "अजित पवार यांनी घेतलेला निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसच्या धोरणाविरोधातला आहे. अजित पवार फुटून जातील असं कधीही वाटलं नव्हतं. अशा फाटाफुटीतून मी गेलो आहे," असं शरद पवार म्हणाले होते.