मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा राज्यात महायुतीचं सरकार येईल असा विश्वास व्यक्त केला आहे. पाच वर्षाचा शेंबडा मुलगाही महायुतीचं सरकार येणार सांगतो असं यावेळी त्यांनी म्हटलं आहे. कणकवलीत भाजपाचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारानिमित्त आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी निलेश राणे यांनी कार्यकर्त्यांसोबत भाजपात प्रवेश केला. तर नारायण राणे यांनी आपला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपात विलीन करत असल्याची घोषणा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी नारायण राणेंचं कौतुक करत नारायण राणे यांचं महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळं स्थान असून, सर्व विषयाची जाण असणारे नेते असल्याचं म्हटलं. तसंच नारायण राणे भाजपातच होते, त्यामुळे त्यांच्या भाजपा प्रवेशाचा प्रश्नच नाही असंही त्यांनी म्हटलं. राणेसाहेब भाजपाचे खासदार म्हणून नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वात राज्यसभेत असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं.

नितेश राणे यांनी यावेळी अधिकृतरित्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. “हा प्रवेश मुंबईत व्हावा अशी अनेकांची इच्छा होती. पण सिंधुदुर्गातील लोकांचं कणकवलीत प्रवेश व्हावा असं म्हणणं होतं त्यामुळेच येथे प्रवेशाचा कार्यक्रम करण्यात आला,” असं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.

देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणे प्रचंड मतांनी विजयी होतील असा विश्वास व्यक्त करत एकूण मतदानाच्या ६० ते ७० टक्के मतं मिळतील असा दावा केला. देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणेंना यावेळी संयम बाळगण्याचा सल्ला दिला. “नितेश राणे आक्रमक आहेत, कारण ते नारायण राणेंच्या नेतृत्त्वात घडले आहेत. पण नितेश राणे यांना आता आमच्या शाळेत घेतलं आहे. त्यांना आमच्या शाळेत संयम शिकवणार आहोत. नारायण राणे जिथे आक्रमक व्हायचं तिथं होतात, संयम बाळगायचा तिथे बाळगतात,” असं यावेळी त्यांनी सांगितलं.

महाराष्ट्रात निवडणुकीत कुठेही चुरस दिसत नाही असं यावेळी फडणवीसांनी सांगितलं. “ही निवडणूक प्रेमाने, जनतेसोबत लढली पाहिजे असं सांगताना अनेक लोक चिथवण्याचा प्रयत्न करतील. जे जिंकणारे असतात त्यांनी वाघासारखं, मोठ्या मनानं वागायचं असतं,” असा सल्ला यावेळी देंवेंद्र फडणवीस यांनी दिला.

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर टीका करत टोला मारला. “राहुल गांधींना महाराष्ट्रात येऊन कितीही डोकं आपटलं तरी काही फरक पडणार नाही माहिती होतं म्हणून ते बँकॉकला फिरायला गेले होते. काँग्रेसचे ४२ चे २४ होतील हे त्यांना माहिती आहे,” असा टोला फडणवीस यांनी मारला. तसंच राहुल गांधींची सभा झाल्याने मला आनंद झाल्याचाही टोला त्यांना लगावला.

काँग्रेसच्या जागा कमी करण्यात राहुल गांधींची मदत नक्की मिळेल अशी खिल्लीही त्यांनी उडवली. तर राष्ट्रवादीवर टीका करताना राष्ट्रवादीत राहायला कोणी तयारच नाही. शरद पवारांची अवस्था शोलेतल्या जेलरसारखी झाली असल्याचं त्यांनी म्हटलं. “पाच वर्षात जे केलं त्याचा हिशोब देण्यास मी तयार आहे, तुम्ही १५ वर्षांचा हिशोब द्या,” असं आव्हान यावेळी त्यांनी दिलं. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी २०२१ पर्यंत प्रत्येक बेघराला घर देणार तसंच कोकणालाही टँकरमुक्त करणार अशी आश्वासनं दिली. दुष्काळमुक्त महाराष्ट्र भाजपाचा संकल्प असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं.