निवडणुकीचे निकाल लागून तीन आठवड्यांचा कालावधी उलटला असला तरी राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. अशातच काँग्रेसचे नेते सचिन सावंत राज्यपाल हे भाजपा चे बाहुले आहेत का? असा सवाल करत भाजपावर हल्लाबोल केला आहे.

राज्यपाल हे भाजपा चे बाहुले आहेत का? सत्तास्थापनेसाठी पुरेसे प्रयत्न न करता इतर पक्षांना पुरेसा वेळ न देता व राष्ट्रवादी काँग्रेसला दिलेला वेळ संपण्याची वाटही न पाहता जर त्यांनी राष्ट्रपती राजवटी शिफारस केली आहे हे खरे असेल तर त्यांची भूमिका त्यांच्या टोपीच्या रंगाला साजेशी ठरेल, असं म्हणत सचिन सावंत यांनी हल्लाबोल केला आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची तयारी सुरु झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने असमर्थता दाखवल्यास महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू शकते अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. या संदर्भात संध्याकाळपर्यंत निर्णय घेतला जाईल. राज्यपालांनी राष्ट्रपतींकडे या संदर्भातला अहवाल पाठवला आहे. त्यामुळे रात्री साडेआठनंतर महाराष्ट्रात कधीही राष्ट्रपती राजवट लागू शकते.

भारतीय राज्यघटनेत कलम ३५२ ते ३६० हे आणीबाणीशी संबंधित आहे. राज्य राज्यघटनेत ३ प्रकारच्या आणीबाणीचे उल्लेख आहे. पहिली राष्ट्रीय आणीबाणी दुसरी आर्थिक आणीबाणी आणि तिसरी राष्ट्रपती राजवट. राज्यघटनेच्या कलम ३५६ मध्ये राष्ट्रपती राजवटीचा उल्लेख आहे. कलम ३५६ नुसार राज्याचे प्रशासन घटनात्मक पद्धतींना अनुसरून चालत नसल्यास राष्ट्रपती राजवट लावण्यात येऊ शकते. तसेच कलम ३६५ नुसार राज्य सरकार केंद्राच्या निर्देशांकडे दुर्लक्ष करत असल्यास त्या राज्यात राष्ट्रपती राजवट घोषित करता येते. मात्र राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा कुठलाही निर्णय राष्ट्रपती स्वतःच्या मर्जीने घेत नसून ते केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानंतरच घेतात.