रवींद्र जुनारकर,चंद्रपूर

लोकसभेच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीत काँग्रेस भाजपा या दोन्ही पक्षाचे मताधिक्य मोठय़ा प्रमाणात घसरले आहे. चंद्रपूर- वणी- आर्णी लोकसभा क्षेत्रांतर्गत सहा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे मताधिक्य विक्रमी २ लाख ५१ हजार ३०९ मतांनी कमी होणे ही काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार बाळू धानोरकर यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे. अवघ्या सहा महिन्यात इतक्या प्रचंड प्रमाणात मताधिक्य कमी झाल्याने मतदारांमध्ये धानोरकर यांच्याविषयी उघड नाराजी दिसून येत आहे.

चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील सहा विधानसभा मतदारसंघातील प्रत्येकी तीन विधानसभा काँग्रेस व भाजपाने जिंकल्या. २०१४ मध्ये भाजपा- शिवसेना युतीचे सहा आमदार होते. तर काँग्रेसचा एकही आमदार नव्हता. मात्र २०१९ च्या विधानसभेत दोन्ही पक्षाचे तीन आमदार विजयी झाले तर भाजपाचे दोन आमदार पराभूत झाले. तीन आमदाराने संख्याबळ वाढल्याने काँग्रेस पक्षात उत्साहाचे वातावरण असले तरी लोकसभेच्या तुलनेत काँग्रेस पक्षाचे मताधिक्य २ लाख ५१ हजार ३०९ मतांनी कमी झाले आहे. सहा महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे बाळू धानोरकर यांना विक्रमी ५ लाख ५९ हजार ५०७ तर भाजपाचे हंसराज अहीर यांना ५ लाख १४ हजार ७७४ मते मिळाली होती. धानोरकर यांनी अहीर यांचा ४४ हजार ७३३ मतांनी पराभव केला होता. परंतु विधानभेत भाजपाच्या तुलनेत काँग्रेसचे मताधिक्य कमी झाले आहे. लोकसभा अंतर्गत येणाऱ्या चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा, वरोरा, वणी व आर्णी या सहा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला ३ लाख ८ हजार १९८ मते मिळाली तर भाजपाला ३ लाख ८३  हजार ९५ मते आहेत. लोकसभेत राजुरा विधानसभेत काँग्रेसला १ लाख ९ हजार १३२ तर भाजपाला ७३ हजार ८८० मते मिळाली होती. चंद्रपूरमध्ये काँग्रेसला १ लाख ३  हजार ९३१ तर भाजपाला ७८ हजार १८७, बल्लारपुरात काँग्रेस ९६ हजार ५४१ तर भाजपा ६५ हजार ४८० मते मिळाली होती. वरोऱ्यात काँग्रेस ८८ हजार ६२७, भाजपा ७६ हजार १६७, वणीमध्ये काँग्रेसला ९० हजार ३६७ तर भाजपा ९२ हजार ३६५ व आर्णीत काँग्रेस ६८ हजार ९५२ तर भाजपा १ लाख २६,६४८ मते मिळाली होती.

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे मताधिक्य कमी झाले आहे. राजुरा मतदारसंघात काँग्रेसचे सुभाष धोटे यांना ६० हजार २२८ तर भाजपाचे अ‍ॅड. संजय धोटे यांना ५१ हजार ५१, बल्लारपूर काँग्रेसचे डॉ.विश्वास झाडे यांना ५२  हजार ७६२ तर भाजपाचे सुधीर मुनगंटीवार यांना ८६ हजार २, वरोऱ्यात काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांना ६३ हजार ८६२ तर शिवसेनेचे संजय देवतळे यांना ५३ हजार ६७५, चंद्रपुरात काँग्रेसचे महेश मेंढे यांना १४ हजार २८४ तर भाजपाचे नाना शामकुळे यांना ४४ हजार ९०९, वणी येथे काँग्रेसचे वामनराव कासावार यांना ३८ हजार ९७३ तर भाजपाचे संजीव रेड्डी यांना ६६ हजार १९६ व आर्णी येथे काँग्रेसचे शिवाजीराव मोघे यांना ७८ हजार ८९ तर भाजपाचे संदीप धुर्वे यांना ८२ हजार २६२ मते मिळाली. लोकसभेत काँग्रेसचे धानोरकर यांना चंद्रपुरात २५ हजार ७४४, राजुरा ३५ हजार २५२, बल्लारपूर ३१ हजार ५००, वरोरा १२ हजार तर वणीत भाजपाला २ हजार व आर्णीत ६३ हजाराचे विक्रमी मताधिक्य मिळाले होते. आता विधानसभा निवडणुकीत राजुरा विधानसभेत लोकसभेच्या तुलनेत काँग्रेसचे मताधिक्य ४८ हजार ९०४, चंद्रपूर ८९ हजार ६८३, बल्लारपूर ४३ हजार ७७९, वरोरा २४ हजार ७६५, वणी ५१ हजार ३९४ मतांनी मताधिक्य कमी झाले. केवळ आर्णी विधानसभेत काँग्रेसचे मताधिक्य ९ हजार १३७ मतांनी वाढले आहे. तर भाजपाचे मताधिक्यही केवळ बल्लारपूर वगळता सर्व पाच विधानसभा मतदारसंघात कमी झाले आहे. मात्र भाजपाच्या तुलनेत काँग्रेस पक्षाला अधिक फटका बसला आहे.