काँग्रेस पक्ष हा सेक्युलर पक्ष आहे सर्वधर्मसमभाव मानणारा पक्ष आहे. काँग्रेसने शिवसेनेसोबत मुळीच जाऊ नये अशी भूमिका सुशीलकुमार शिंदे यांनी घेतली आहे. सुशीलकुमाऱ शिंदे हे माजी केंद्रीय मंत्री आहेत. त्यांनी काँग्रेसने शिवसेनेसोबत जाण्याच्या भूमिकेला कडाडून विरोध दर्शवला आहे. जनमत मान्य करुन काँग्रेसने विरोधात बसावं असंही त्यांनी म्हटलं आहे. काँग्रेस हा सेक्युलर पक्ष आहे काँग्रेस पक्षाची विचारधारा आणि शिवसेनेची विचारधारा या दोहोंमध्ये खूप फरक आहे. त्यामुळे काँग्रेसने शिवसेनेसोबत जाऊ नये असं माझं स्पष्ट मत आहे असं शिंदे यांनी म्हटलं आहे.

निवडणुकीच्या धामधुमीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष थकले आहेत असं वक्तव्य सुशीलकुमार शिंदे यांनी केलं होतं. त्यावरुन त्यांच्यावर टीकाही करण्यात आली. शरद पवार यांनीही सुशीलकुमार शिंदे यांना खडे बोल सुनावले होते. शरद पवार यांनी विरोधकांना चेहरा देऊन झंझावाती प्रचार केला. त्याचा परिणाम निवडणूक निकालात दिसून आला. राष्ट्रवादीच्या जागा वाढल्या आणि काँग्रेसच्याही जागा वाढल्या. अब की बार २२० पार हा भाजपाचा नारा हवेत विरला. भाजपाला १०५ जागांवर समाधान मानावं लागलं तर शिवसेनेला ५६ जागांवर समाधान मानावं लागलं. २०१४ च्या तुलनेत दोन्ही पक्षांच्या जागा घटल्या. आता महायुतीला जनतेने कौल दिला आहे. मात्र शिवसेनेने अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदावर दावा सांगितला आहे. त्यामुळे राज्यात सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला आहे.

आणखी वाचा- शिवसेनेला वाटत असेल तर त्यांचा मुख्यमंत्री होऊ शकतो : नवाब मलिक

अशात आता काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा देऊन भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याची तयारी सुरु केल्याचं सूत्रांकडून समजतं आहे. याच पार्श्वभूमीवर सुशीलकुमार शिंदे यांनी काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा देऊ नये असं म्हटलं आहे. एवढंच नाही तर आपल्या विचारधारा वेगळ्या आहेत हे लक्षात ठेवावं आणि जनमताचा आदर करावा असंही त्यांनी म्हटलं आहे.