मुख्यमंत्र्यांच्या मेट्रो विभागात आणि शिवस्मारकाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. काँग्रेस आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हा आरोप केला, यावेळी त्यांनी शिवस्मारकाच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची कागदपत्रे पत्रकार परिषदेत सादर केली. “मुख्यमंत्री कार्यालयातून एलएनटीला काम देण्याचा प्रयत्न झाला. इतकं प्रेम का आहे ? सर्व कामे एलएनटीला का मिळत आहेत. कॅगचे अधिकारी यांच्यावर दबाव आणला जात आहे,” असा आरोप यावेळी नवाब मलिक यांनी केला.

“यांनी शिवस्मारकालाही भ्रष्टाचारातून सोडले नाही. हिंमत असेल तर आजच मुख्यमंत्र्यांनी या आरोपाचा खुलासा करावा. आम्ही दुसर्‍या टप्प्यात दुसरी कागदपत्रे समोर आणणार आहोत,” असंही नवाब मलिक यांनी यावेळी सांगितलं.

“महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक असताना भाजपाने घोषवाक्य दिलं होतं. छत्रपतींचा आशिर्वाद चलो चले मोदी के साथ असे सांगत पाच वर्षांत वारंवार पारदर्शक कारभार करत असल्याचे सांगितले. मात्र आम्ही मुख्यमंत्री यांच्या मंत्रीमंडळातील २१ मंत्र्यांवर घोटाळयाचे आरोप झाले. त्यामध्ये डाळ चिक्की, अशाप्रकारचे घोटाळे बाहेर निघाले. परंतु आजही मुख्यमंत्री म्हणत आहेत आमच्या सरकारवर आरोप झालेले नाहीत. ते विसरत आहेत की, दोन मंत्री भ्रष्टाचारामुळे वगळण्यात आले. तर उर्वरित मंत्र्यांची चौकशी न लावता क्लीनचीट दिली. मुख्यमंत्री यांच्याच खात्यात सर्वाधिक भ्रष्टाचार झाला आहे,” असा आरोपही नवाब मलिक यांनी केला.

“लोकपाल मान्य झाले त्यावेळी विरोधी बाकावर उभे राहून लोकायुक्त कधी आणणार असे आताचे मुख्यमंत्री विचारत होते. पाच वर्षांत कर्नाटकच्या धर्तीवर कायदा आला नाही. त्यांच्याच विभागात सर्वाधिक भ्रष्टाचार आहे. जयकुमार कंपनीला सात हजार कोटींची कामे दिली,” असाही आरोप नवाब मलिक यांनी केला.

“ज्यांच्या नावाने सत्तेत आले त्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने भ्रष्टाचार केला आहे .पंतप्रधानांच्या हस्ते शिवस्मारकाचे जलपुजन झाले होते मात्र, आजही याचे काम सुरू झालेले नाही. उलट याच शिवस्मारकाच्या कामात भ्रष्टाचार झाला,” असल्याचं नबाव मलिक यांनी म्हटलं आहे.