भाजपा शिवसेना युतीला महाराष्ट्रातील जनतेने कौल दिला आहे. त्यामुळे सरकार महायुतीचंच येणार हे उघड आहे. शिवसेनेशी चर्चा सुरु आहे. दोन्ही पक्षांमधला तिढा लवकरात लवकर सुटेल अशी अपेक्षा नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. इतकंच नाही तर १०५ जागा जिंकल्याने मुख्यमंत्री भाजपाचाच होईल असाही विश्वास नितीन गडकरींनी व्यक्त केला. देवेंद्र फडणवीस यांची निवड एकमताने करण्यात आली आहे. त्यामुळे तेच मुख्यमंत्री होतील असंही गडकरींनी स्पष्ट केलं. यावेळी गडकरींना तुम्ही मुख्यमंत्री होऊ शकता अशी चर्चा रंगली आहे असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा ते म्हणाले की मला मी केंद्रात काम करतो आहे. मुख्यमंत्रीपदासाठी उत्सुक नाही असं त्यांनी स्पष्ट केलं.

नितीन गडकरी हे शिवसेनेची समजूत घालू शकतात असा अंदाज माध्यमांकडून व्यक्त करण्यात येत होता. आज ते नागपुरात दाखल झाले तेव्हा त्यांना सत्तास्थापनेबाबत विचारण्यात आलं. तेव्हा भाजपाने १०५ जागा जिंकल्या आहेत त्यामुळे भाजपाचाच मुख्यमंत्री होणार आणि मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान होतील असंही त्यांनी स्पष्ट केलं.

आणखी वाचा- शिवसैनिकाच्या रुपाने देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार : सुधीर मुनगंटीवार

भाजपा आणि शिवसेना यांच्यात सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला आहे. विधानसभा निवडणूक निकाल लागून १३ दिवस उलटून गेले आहेत,  तरीही सरकार स्थापन करण्यात आलेलं नाही. शिवसेनेकडून रोजच मुख्यमंत्री शिवसेनेचा होईल अशी घोषणा केली जाते आहे. हा सगळा पेच निर्माण झालेला असताना नितीन गडकरींनी मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीसच विराजमान होतील असं म्हटलं आहे.