राष्ट्रपती राजवटीबाबत मुनगंटीवार यांच्या विधानावर राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्याची मला कीव करावीशी वाटते. महायुती म्हणून अनेक पक्षांनी एकत्र येऊन राज्यातील निवडणूक लढवली. महायुतीला स्पष्ट बहुमत असताना हे लोक सरकार स्थापन करू शकत नाहीत. यांना बहुमत दिलं तरी ते राष्ट्रपती राजवटीची भाषा करतात, हा राज्यातील जनतेचा अपमान असल्याचं धनंजय मुंडे यांनी मुंबईत म्हटलं आहे.

दरम्यान मुनगुंटीवार यांनी राज्यातील जनतेची आधी माफी मागावी आणि मग राष्ट्रपती राजवटीची भाषा करावी. आघाडीला विरोधी पक्षाचा कौल राज्यातील जनतेने दिला आहे.तो कौल लक्षात घेऊन आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करू. काँग्रेसचे नेते दिल्लीत गेले आहेत, त्यांचे काय ठरेल तेव्हा बघू, आता जर तर बाबत मी बोलणार नाही असंही धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

शेतकऱ्यांना मदत करा –
तसेच परतीच्या पावसाने शेतीचं नुकसान झालं आहे. आज पुन्हा एकदा शेतकरी उद्ध्वस्त झालाय. शेतकऱ्यांना नुकसानीची पूर्ण भरपाई सरकारने द्यावी अशी मागणीही मुंडे यांनी केली आहे.