विविध पक्षांतून आलेल्यांमुळे कामे वाटण्यात अडचणी शिवसेनेमध्ये गेल्या काही महिन्यांपासून इनकमिंग सुरू असून अनेक लहान-मोठे नेते, कार्यकर्ते पक्षांमध्ये दाखल झाले आहेत. आगामी निवडणुकीसाठी या नेत्यांच्या झालेल्या भाऊगर्दीत नेमकी कोणाला कोणती कामे द्यावी यात अडचणी निर्माण होत आहे. नव्या-जुन्या नेत्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी ठाण्यातील संपर्कप्रमुखांना पालघर-बोईसरमध्ये बैठका घ्याव्या लागत आहेत. त्याचप्रमाणे नव्याने दाखल झालेल्यांना सोबत घेऊन चला अशा प्रकारचे संदेश दिल्यानंतरही त्याचे पालन होत नसल्याने शिवसेनेत वेगवेगळे गट निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे. शाखाप्रमुख, तालुकाप्रमुख व जिल्हाप्रमुख ही सर्वसामान्य शिवसैनिकांसाठी पक्षातील मुख्यपदे मानली जातात. गेल्या काही वर्षांत शिवसेना पक्षात आलेल्या वेगवेगळ्या नेत्यांना सामावून घेण्यासाठी सहसंपर्क प्रमुख, समन्वयक, विभागीय स्तरावरील विविध पदे आणि वेगवेगळ्या आघाडय़ांच्या रूपाने पदे निर्माण केली आहेत. त्यामुळे या नव्याने निर्माण होत असलेल्या पदांच्या रचनेमध्ये ज्येष्ठ कोणाला म्हणावे, सभा-कार्यक्रमामध्ये राजशिष्टाचार कसा पाळावा असा सर्वसामान्य शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. विधानसभा निवडणुकीच्या काळात या नव्या-जुन्या नेत्यांनी वेगवेगळ्या भागांमध्ये आपले वर्चस्व असल्याचे दावे व प्रतिदावे केले आहेत. विशिष्ट क्षेत्रांची जबाबदारी आपल्यावर सोपवावी आणि त्या ठिकाणी लागणाऱ्या सर्व सुविधा पुरवण्यासाठीचा मोबदला आपल्याला मिळावा यासाठी चढाओढ निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे प्रचारासाठी जीपगाडय़ा भाडय़ाने लावणे, फलक लावणे तसेच जाहीर सभांच्या आयोजनाची जबाबदारी स्वीकारण्यासाठीही अनेक स्थानीय नेते तयारी दाखवत असल्याने कोणाला कोणती कामे नेमून द्यावी याबाबत समन्वय साधण्यासाठी जिल्ह्याचे संपर्कप्रमुख आमदार रवींद्र फाटक यांनी पालघर व बोईसरचा ९ ऑक्टोबर रोजी दौरा केला. शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांची केलेल्या तयारीबाबत झाडाझडती घेऊन परस्परांमध्ये संवाद साधण्याच्या सूचना दिल्या. नव्याने पक्षात दाखल झालेल्या नेत्यांना निवडणूक काळात ज्येष्ठ मंडळीने सोबत फिरवावे तसेच त्यांच्या प्रभाव क्षेत्रातील जबाबदारी सोपवण्याचा संदेश या बैठकीमध्ये देण्यात आला आहे. मतदारयाद्यांची तसेच परिपत्रकांची वितरण करणे बूथवरील प्रतिनिधींची नाव अंतिम करणे तसेच वेगवेगळ्या उपक्रमांसाठी लागणाऱ्या खर्चाचा अंदाज बांधण्याचे काम संपर्कप्रमुखामार्फत केले जाते. मात्र शिवसेनेमध्ये कार्यकर्त्यांपेक्षा नेत्यांची संख्या अधिक असल्याने कोणाला काय काम द्यायचे याबाबत अडचणी निर्माण झाल्या आहेत. नाराजांना एकत्र आणण्याचे आव्हान पालघर जिल्ह्यातील पालघर, बोईसर, नालासोपारा, वसई या चार मतदारसंघांमध्ये शिवसेना निवडणूक लढवत आहे. या मतदारसंघांची जबाबदारी वेगवेगळ्या स्थानिक नेत्यांना तसेच जिल्हाप्रमुखांना सोपवण्यात आली आहे. उमेदवारांच्या दौऱ्यासह जिल्हा परिषद गटनिहाय कार्यकर्त्यांच्या बैठका घेणे, युतीच्या नेत्यांसोबत समन्वय साधणे ही कामे सध्या हाती घेण्यात आली आहेत. विधानसभेच्या निवडणूक प्रचाराकरिता वेळ कमी उपलब्ध होत असल्याने दरम्यानच्या काळात कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करणे तसेच मतदारसंघात वातावरणनिर्मिती करणे कठीण होत आहे. या पाश्र्वभूमीवर रंगतदार लढती असलेल्या ठिकाणी पक्षातील तसेच मित्र पक्षातील नाराज घटकांना एकत्र आणण्याचे आव्हान शिवसेना-भाजपच्या नेत्यांसमोर दिसून येत आहे.