विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात एक लाख १७ हजारहून अधिक लष्करी, केंद्रीय आणि राज्य सशस्त्र पोलीस दलामधील जवान असलेल्या मतदारांची (सव्‍‌र्हिस व्होटर्स) नोंद झाली असून त्यांच्यापर्यंत ‘इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलट सिस्टीम’द्वारे (ईटीपीबीएस) ऑनलाइनरीत्या मतपत्रिका पोहोचवण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे.

सी-डॅकच्या साहाय्याने ‘ईटीपीबीएस’ यंत्रणा विकसित करण्यात आली असून लष्करी, केंद्रीय आणि राज्य सशस्त्र पोलीस बलांमधील जवान तसेच प्रशिक्षणासाठी किंवा शासकीय सेवेनिमित्त प्रतिनियुक्तीवर परदेशात असलेल्या भारतीय अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी आयोगाने ही व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे.

सन २०१६ मध्ये पुद्दुचेरीतील नेल्लीथोप मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत पहिल्यांदा ‘ईटीपीबीएस’चा वापर करण्यात आला. लोकसभा निवडणुकीतही ईटीपीबीएस यंत्रणेचा वापर करण्यात आला. या यंत्रणेच्या माध्यमातून मतपत्रिका ऑनलाइनरीत्या सव्‍‌र्हिस व्होटर्सपर्यंत पोहोचवल्या जातात. लष्करी दले अथवा अन्य सव्‍‌र्हिस व्होटर्स असलेल्या सेवांमधील नोडल अधिकारी सव्‍‌र्हिस व्होटर्सचे ईटीपीबीएससाठीचे अर्ज जिल्हा निवडणूक (जिल्हाधिकारी) अधिकाऱ्यांकडे पाठवितात. जिल्हाधिकारी ही यादी संबंधित मतदारसंघातील मतदार नोंदणी अधिकाऱ्याकडे पाठविल्यानंतर संबंधित अधिकारी  निर्णय घेतात.

मतदानाच्या  १० दिवसापूर्वी सव्‍‌र्हिस व्होटर्सना ईटीपीबी यंत्रणेद्वारे ऑनलाइन पद्धतीने मतपत्रिका पाठविल्या जातात. मतपत्रिकांचा  पोस्टाद्वारे होणारा मतदारांपर्यंतचा एका बाजूचा प्रवास वाचण्यासह निवडणूक प्रशासनावरील ताण कमी होतो. या मतपत्रिका डाऊनलोड आणि प्रिंट काढून मतपत्रिकेवर  मत नोंदविल्यानंतर विहित पद्धतीने पोस्टाने पाठविणे आवश्यक असते.

सातारा जिल्ह्य़ात सर्वाधिक १२ हजार मतदार

या वर्षी प्रसिद्ध झालेल्या अंतिम मतदार यादीनुसार राज्यात एक लाख १७ हजार ५८१ इतके लष्करी सेवेतील मतदार असून सर्वाधिक १२ हजार ६५८ इतके मतदार सातारा जिल्ह्य़ात असून सर्वात कमी ३१० इतके पालघर जिल्ह्य़ात आहेत.