विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या अशी मागणी महाराष्ट्रातल्या काही पक्षांनी केली होती. मात्र बॅलेटपेपर इतिहासजमा झाले आहे. आता ईव्हीएमवरच निवडणूक घेण्यात येईल असं मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. मनसे अर्थात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि वंचित बहुजन आघाडीने निवडणूक बॅलेट पेपरवर घ्यावी अशी मागणी केली होती. मात्र मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी विधानसभा निवडणूक ईव्हीएमवरच होणार असल्याचं म्हटलं आहे. तसंच बॅलेट पेपर इतिहासजमा झाल्याचंही म्हटलं आहे.

EVM मध्ये तांत्रिक बिघाड होऊ शकतो, मात्र त्या मशीनसोबत छेडछाड होणं शक्य नाही असंही सुनील अरोरा यांनी म्हटलं आहे. मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत सुनील अरोरा यांनी ही माहिती दिली.

निवडणूक दिवाळीनंतर?
काही पक्षांनी निवडणूक आयोगाकडे विनंती केली आहे की दिवाळीनंतर निवडणूक घ्या. सांगली, सातारा, कोल्हापूर या ठिकाणी आलेल्या पुराचाही उल्लेख सुनील अरोरा यांनी पत्रकार परिषदेत केला. या भागातल्या लोकांना ज्या संकटाचा सामना करावा लागला त्याची निवडणूक आयोगाला कल्पना आहे असंही अरोरा यांनी स्पष्ट केलं.