“दुष्काळ आणि अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल. बेरोजगारी कमी करण्याबरोबरच शेती, उद्योग, आरोग्य, शिक्षण या क्षेत्रांसह राज्याच्या सर्वांगिण विकासासाठी सरकार कटिबद्ध असेल, असं प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं. अधिवेशनात राज्यपालांचं अभिभाषण झालं. यावेळी त्यांनी आगामी काळात करण्यात सरकारकडून करण्यात येणाऱ्या कामांचा उहापोह केला.

विधानसभेच्या सकाळच्या सत्रात सभागृहाच्या अध्यक्षांची निवड करण्यात आली. त्याचबरोबर विरोधी पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली. त्यानंतर दोन्ही निवडीच्या ठरावांवर सदस्यांनी मनोगत व्यक्त केलं. काही काळ कामकाज स्थगित केल्यानंतर दुपारी चार वाजता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं अभिभाषण झालं.

राज्यपाल कोश्यारी म्हणाले, “सीमा भागातील जनतेला न्याय देण्यासाठी सरकार प्रयत्न करणार. १६५ गावातील जनतेला न्याय देण्यासाठी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणाचा पाठपुरावा करेल. त्याचबरोबर राज्यातील ३४९ गावातील अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीनं मदत देणार. महापुरामुळे नुकसान झालेल्यांना भरपाई देण्यास शासन कटिबद्ध असून, हे सरकार शेतकऱ्यांना कर्जमुक्त आणि चिंतामुक्त करेल आणि शेतमालाला योग्य भाव देण्यासाठी योग्य पावले उचलणार,” असं ते म्हणाले.

पुढे राज्यपाल म्हणाले, “वाढती बेरोजगारी कमी करण्याला सरकारचे प्राधान्य आहे. रोजगारनिर्मिती आणि भूमिपुत्रांना नोकऱ्यांसाठी शासन कायदा करेल. शिक्षणाच्या दर्जामध्ये सुधारणा करण्यासाठी सर्व उपाययोजना हाती घेणार. त्यातून प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यात येईल. मराठवाडा आणि विदर्भाच्या विकासासाठी विशेष स्तरावर शासनाकडून प्रयत्न केले जातील. त्याचबरोबर राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी शिस्त लावण्याचा प्रयत्न सरकार करेल,”असंही राज्यपाल आपल्या भाषणात म्हणाले.