निवडणुकीच्या प्रचारात विरोधकांवर टीका करताना कधी कुणाचा तोल सुटेल सांगता येत नाही. मतदारांसमोर विरोधकांच्या उखळ्या पाखाळ्या काढताना नेत्यांना सभ्य भाषेचा विसर पडतो. हे वारंवार ऐकायला मिळाल आहे. पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आणि आता शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे संस्थापक हर्षवर्धन जाधव यांचीही शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना जीभ घसरली. एका प्रचारसभेत बोलताना त्यांनी अश्लाघ्य भाषेत टीका केली असून, त्यांच्या या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मोजकेच दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक युद्धच बघायला मिळत आहे. निवडणुकीच्या प्रचारात सुरूवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पैलवानाच्या विधानावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी हातवारे करत उत्तर दिलं होतं. त्यानंतर यावरून बराच वाद झाला. मुख्यमंत्र्यांनीही आम्ही नटरंगसारखं काम करत नसल्याचा टोला लगावला होता.

या वादाची धूळ खाली बसत असतानाच शिस्वराज्य बहुजन पक्षाचे अध्यक्ष हर्षवर्धन जाधव यांनी अश्लिल भाषेत टीका केली आहे. काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार यांनी विधानसभेच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर शिवसेनेही भाजपाकडे असणारा सिल्लोड विधानसभा मतदारसंघ स्वतःकडं घेत सत्तारांना उमेदवारी दिली. सत्तार यांच्या उमेदवारीवरून हर्षवर्धन जाधव यांनी टीका केली आहे.

एका प्रचार सभेत बोलत असताना हर्षवर्धन जाधव म्हणाले, “हा हरामखोर हर्षा, याच्यामुळे मुसलमान निवडून आला लोकसभेला. हे शिवसेनेचं भाषण आहे. दुसरं काही भाषण नाही त्यांच्याकडं. आमचा उमेदवार असं करतो, तसं करतो हे नाही. आमच्या खासदाराने पंचवीस वर्षात काय केलं हे नाही. आमच्या उमेदवाराला किती अक्कल आहे, तो ट्रफिक पोलिसला फोन करू शकतो की नाही, हे नाही. तर काय? हर्षामुळे मुसलमान आला ना निवडून. आहो तुम्ही येडे झाले का, त्याला कुठं मतदान करू ऱ्हायले. हे शिवसेनेच भाषण राहणार आहे उद्या. केलंच तसं भाषण त्यांनी परवा, उद्धव ठाकरेंनी. हिरवा वरती चढवला, भगवा खाली आला. मी त्यांना एक प्रश्न विचारतो, विधानसभेतही विचारतो आणि तुमच्या समक्षही शिवसैनिकांना विचारतो. एव्हढंच तुम्हाला मुसलमानांच्याबद्दल वावडं आहे, तर सत्तार तुमचा कोण लागतो? कोण लागतो सत्तार तुमचा? पाहुणा आहे, चुलता आहे? हमारे अब्दुल भाई अभी अभी शिवसेना में आये है…,” अशी पातळी सोडत हर्षवर्धन जाधव यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. त्यांचं हे भाषण सोशल मीडियातून प्रचंड व्हायरल होतं आहे.