कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवत असलो तरीही भाजपात गेलो नाही असं म्हणत रामदास आठवले यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली आहे. भाजपा आमचा मित्रपक्ष आहे, मात्र मी जागावाटपावर समाधानी नाही असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. नाशिकमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जागावाटपावर समाधानी नसलो तरीही दुसरा पर्याय नसल्याने जे वाट्याला येईल त्यात समाधान मानतो आहे. आरपीआयला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद देण्याचीही मागणी आठवले यांनी यावेळी केली.

वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याबाबतही रामदास आठवलेंनी भाष्य केलं. वंचित बहुजन आघाडीला लोकसभा निवडणुकीच्या वेळी चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र विधानसभेच्या वेळी सत्ता येईल इतकी मतं वंचितला मिळणार नाहीत असं रामदास आठवलेंनी म्हटलं आहे. शिवसेना भाजपा यांच्या युतीनंतर अलीकडच्या काळात कोण कुठं जातंय हेच समजत नाही असंही आठवले यांनी स्पष्ट केलं. आमच्यावर अन्याय झाला आहे पण तो सहन करुन पुढे जायची आम्हाला सवय आहे असंही आठवलेंनी म्हटलं आहे.