पुणे : निवडणुकीपूर्वी पक्षाने राज्यातील सर्व जागांचे सर्वेक्षण केले होते. त्या सर्वेक्षणानुसार कोथरूड विधानसभा मतदारसंघातून मी निवडणूक लढवावी, असे मला सांगण्यात आले. निवडणूक लढवीत असलो तरी मुख्यमंत्रिपदाची कोणतीही अपेक्षा मला नाही, असे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी केले.

चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी ‘लोकसत्ता’ प्रतिनिधीशी संवाद साधला. कोथरूडसह अन्य तीन मतदारसंघांचा विचार माझ्यासाठी झाला होता. यात कोल्हापूरचाही समावेश होता. मात्र राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन मला या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास सांगण्यात आले. सर्वेक्षणानुसार राज्यातील काही मंत्र्यांना उमेदवारी नाकारली असली तरी त्यांना वेगळी जबाबदारी दिली जाईल.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दूरदृष्टी असलेले नेते आहेत. अनेक मुद्दे ते व्यवस्थित हाताळत आहेत. माझ्यावर कोणती जबाबदारी द्यायची हे पक्षनेतृत्व ठरवेल. शिवसेनेकडून भाजपवर सातत्याने टीका करण्यात येत होती. या पाश्र्वभूमीवर बोलताना ते म्हणाले की, युती असो किंवा केवळ पक्ष नाराजी व्यक्त करणे अपेक्षित असते. ती नाराजी दूर करणे कौशल्याचे काम आहे. शिवसेनेची भाजपने कोणत्याही प्रकारची फसवणूक केलेली नाही.