भाजपाचे अहमदनगरचे खासदार सुजय विखे पाटील यांनी स्वतःबाबतच एक वक्तव्य केलं आहे. पुढची 20 वर्षे मीच खासदार राहणार असं सुजय विखे पाटील यांनी सांगून टाकलं आहे. "पुढील 20 वर्षे अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचा खासदार मीच असणार आहे. तुमची कामं करायची असतील तर मलाच पुन्हा निवडून द्या " असेही सुजय विखे पाटील यांनी म्हटलं आहे. नगर तालुक्यातील गुंडेगाव या ठिकाणी विकास कामांचे उद्घाटन झाले त्याच कार्यक्रमात सुजय विखे पाटील यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही दिवसांपूर्वी सुजय विखे पाटील यांनी संगमनेर या ठिकाणी महाजनादेश यात्रेदरम्यान इंदुरीकर महाराजांना भाजपाचा गमझा घालण्याचा प्रयत्न केला. मात्र इंदुरीकर महाराजांनी सुजय विखे पाटील यांचा हात धरत मी कोणत्याही पक्षाचं राजकीय बॅनर गळ्यात घालणार नाही असं स्पष्ट केलं आणि सुजय यांना रोखलं. या घटनेची चर्चाही अहमदनगरमध्ये चांगलीच रंगली होती. सुजय विखे पाटील यांनी भाजपा प्रवेशानंतर अहमदनगरमध्ये लोकसभा निवडणूक लढवली. राष्ट्रवादीचे संग्राम जगताप आणि भाजपाचे सुजय विखे पाटील यांच्यात हा सामना झाला. ज्यामध्ये सुजय विखे पाटील विजयी झाले. आता पुढची वीस वर्षे मीच नगर लोकसभा मतदारसंघातून निवडून येईन असं वक्तव्य सुजय विखे पाटील यांनी केलं आहे. यावरुन राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत. सुजय विखे पाटील यांनी गुंडेगाव या ठिकाणी केलेल्या वक्तव्याची चर्चा सोशल मीडियावर आणि अहमदनगरमध्येही रंगली आहे. " पुढची 20 वर्षे मीच खासदार असणार आहे. माझ्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. आगामी काळातही भाजपाचीच सत्ता राहणार आहे. पुन्हा एकदा मलाच निवडून द्या. कामं करताना विखे पाटील यांचा शब्द महत्त्वाचा असतो. ते कागदावर कधीही आश्वासन देत नाहीत. म्हणून मी तुम्हाला जे काही आश्वासन देतो आहे ते पूर्ण होईलच यात शंका बाळगू नका" असंही सुजय विखे पाटील यांनी स्पष्ट केलं.